
सावंतवाडी : डोंगर जमीन पोखरून सपाटीकरण करुन पाण्याचे मार्ग बदलून आसपासच्या राहत्या घरांना धोका निर्माण करून नुकसान केल्याबाबत माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांचे लक्ष वेधले आहे. यावर कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
कारिवडे-भैरववाडी, ता. सावंतवाडी, येथील भोगटेनगर मधील रहिवासी असून आमच्या वाडीमध्ये ३५ ते ४० राहती घरे आहेत. लगत असलेले भैरववाडी येथील २५ एकरमध्ये जेसीबी तसेच पोकलॅन सारख्या मोठ्या यंत्राच्या सहाय्याने जमिनीचे सपाटीकरण केल्यामुळे पावसाचे पाणी व माती ही आमच्या विहीर व घरापर्यंत वाहून मोठ्या प्रमाणात येत आहे. यामुळे आमच्या घराला धोका असून कंपाऊंड वॉलचे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसावेळी सपाटीकरणामुळे त्याकडील पाणी व माती मोठ्या प्रमाणात आमच्या जमिनीत शिरत असल्याने आमचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच वाहून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे आमची घरे, विहीर व कंपाऊंड वॉलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वेळप्रसंगी आमच्या घरांना धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी यावर तात्काळ कार्यवाही करुन झालेली नुकसान भरपाई मिळावी. तसेच कंपाऊंड वॉल पूर्णपणे कोसळल्याने आमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. यावर पाहणी करुन कायदेशीर कारवाई करावी तसेच जमिनीचे उत्खनन करून सपाटीकरण केल्याने आसपासच्या लोकांचे झालेले नुकसान भरपाई मिळावी. तसेच जमिनीचे उत्खनन करण्यासाठी कायदेशीर कोणत्या बाबींची पुर्तता झालेली आहे, त्यासाठी परवानगी घेतली किंवा कसे याचीही रितसर चौकशी करून कार्यवाही करावी. तसेच सपाटीकरणामुळे बदललेले पाण्याचे प्रवाह पूर्वीप्रमाणे रण्याची संबंधितांना ताकिद देऊन प्रत्यक्ष काम करून घ्यावे, जेणेकरुन पुन्हा लोकांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी व झालेले नुकसान तात्काळ भरपाई करुन मिळावे अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी माजी नगरसेवक सुरेश भोगटे, आनंद आरोलकर यांसह स्थानिकांनी केली आहे.












