
सावंतवाडी : नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांना गढूळ पाणी आल्याने ते चांगलेच आक्रमक झाले. लोकांच्या जीवाशी का खेळता ? जर हानी झाली तर जबाबदार कोण ? असा सवाल त्यांनी केला. मुख्याधिकारी यांना भेटण्यासाठी ते गढूळ पाणी घेऊन आले होते. मात्र, ते अनुपस्थित असल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांची त्यांनी भेट घेतली. यावेळी परिस्थिती न सुधारल्यास नगरपरिषदेवर मोर्चा घेऊन येणार असा इशारा श्री. वारंग यांनी दिला.
माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांनी प्रशासकीय अधिकारी वैभवकुमार अंधारे यांना याबाबत जाब विचारला. गढूळ पाणी लोकांना का सोडलं जात ? असा सवाल केला. यावेळी अधिकारी श्री. अंधारे यांनी पाईप लाईन लिकेज असल्याने असा प्रकार घडला असल्याचे सांगत आजच्या दिवसात दुरूस्ती करून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी आक्रमक झालेल्या श्री. वारंग यांनी जर हे पाणी ग्रहण करून लहान मुलांसह नागरिकांच्या तब्येती बिघडल्या तर जबाबदार कोण असा सवाल करत तात्काळ कार्यवाही न झाल्यास नगरपरिषदेवर मोर्चा घेऊन येणार असा इशारा दिला. तर अशोक पवार यांनी महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार असा सवाल अधिकाऱ्यांना केला. यावेळी संबंधित कंपनीकडून भरपाई केली जाईल असं उत्तर अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, सत्यजित धारणकर, अशोक पवार आदी उपस्थित होते.











