
नागरिक संतप्त
दोडामार्ग :
शहरातील वीजपुरवठ्याचा बोजवारा उडाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील केळीचे टेंब परिसरात काल दुपारपासून रात्रीपर्यंत वीजपुरवठा पूर्णपणे खंडित होता. त्यानंतरही वारंवार वीज ये-जा होत असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. आज सकाळीही पुन्हा वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचा संताप अधिकच वाढला आहे. सतत वीज खंडित होण्यामुळे घरगुती कामे, व्यावसायिक व्यवहार तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. वारंवार होणाऱ्या कमी-जास्त दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे विद्युत उपकरणे खराब होण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे.पावसाळा सुरू होण्यापूर्वी महावितरणकडून वीजवाहिन्यांची दुरुस्ती, झाडांच्या फांद्यांची छाटणी, ट्रान्सफॉर्मर व इतर यंत्रणेची देखभाल केल्याचा दावा केला जातो. मात्र, पावसाच्या सुरुवातीलाच अशी परिस्थिती निर्माण होत असल्याने प्रत्यक्षात कोणती कामे करण्यात आली, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.वीजपुरवठा वारंवार खंडित होण्यामागील नेमके कारण काय, बिघाड कधी दूर होणार आणि भविष्यात अशी परिस्थिती टाळण्यासाठी महावितरण कोणती उपाययोजना करणार, असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.










