LIVE UPDATES

‘सिंधुदुर्गचे नागरिक चौकस; हक्कांसाठी लढतात, चांगल्या कामाला साथही देतात’

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचा वर्षभराच्या कार्यकाळाचा आढावा; ३० वर्षांचा सिंधुदुर्गनगरीच्या महसुली गावाचा प्रश्न मार्गी लावल्याचे समाधान
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 31, 2026 20:31 PM
views 17  views

सिंधुदुर्गनगरी : “सिंधुदुर्गचे नागरिक चौकस आहेत. आपल्या हक्कांसाठी ते ठामपणे लढतात; मात्र प्रशासनाकडून चांगले काम होत असेल तर त्याला तेवढ्याच सकारात्मकतेने सहकार्यही करतात,” अशा शब्दांत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सिंधुदुर्गवासीयांच्या स्वभाव वैशिष्ट्याचे कौतुक केले. जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारून आज एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी गेल्या वर्षभरातील प्रशासनाच्या कामांचा आढावा घेतला.

या वर्षभरात जिल्ह्यात अनेक महत्त्वाच्या निवडणुका पार पडल्या. प्रशासनासमोरील विविध आव्हाने, निवडणूक प्रक्रिया आणि जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्रशासनाने सातत्याने प्रयत्न केले. या सर्व निवडणुका शांततेत आणि सुरळीतपणे पार पाडण्यात प्रशासनाला यश आल्याचे धोडमिसे यांनी सांगितले.

३० वर्षांचा प्रश्न अखेर मार्गी!

जिल्हाधिकारी म्हणून आपल्या एक वर्षाच्या कार्यकाळातील सर्वात महत्त्वाच्या कामांपैकी एक म्हणजे सिंधुदुर्गनगरीला महसुली गावाचा दर्जा मिळवून देणे, असे धोडमिसे यांनी विशेषत्वाने नमूद केले. सिंधुदुर्गनगरीची निर्मिती होऊन तब्बल तीन दशके उलटली होती. मात्र, गावाचा महसुली दर्जा आणि त्यासंदर्भातील अधिकृत अभिलेखांचा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित होता. त्यामुळे येथील नागरिकांच्या मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे आणि अभिलेखांचा प्रश्नही महत्त्वाचा ठरत होता.

प्रशासनाच्या माध्यमातून हा गुंतागुंतीचा प्रश्न मार्गी लावत सिंधुदुर्गनगरीला महसुली गाव म्हणून अधिकृत ओळख मिळवून देण्यात आली. गावाचे आवश्यक अभिलेख तयार करण्यात आले असून नागरिकांना सातबारा उतारेही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या प्रश्नाला अखेर मूर्त स्वरूप मिळाल्याने नागरिकांना त्यांच्या मालमत्तेशी संबंधित अधिकृत अभिलेख उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

‘प्रशासन आणि नागरिकांमध्ये विश्वास महत्त्वाचा’

सिंधुदुर्गसारख्या जिल्ह्यात प्रशासनासमोर स्थानिक पातळीवरील विविध प्रश्न असतात. मात्र नागरिक जागरूक असल्याने प्रशासनानेही त्यांच्याशी संवाद ठेवून प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले. नागरिकांच्या अपेक्षा, त्यांच्या समस्या आणि प्रशासनाची भूमिका यामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न वर्षभर करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, जिल्ह्यातील ताज हॉटेल प्रकल्पाचे कामही लवकरच पूर्णत्वास येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

एक वर्षाच्या कार्यकाळात अनेक आव्हाने

जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतरच्या वर्षभरात विविध निवडणुका, प्रशासकीय प्रश्न, विकासकामे आणि नागरिकांच्या मागण्यांचा सातत्याने पाठपुरावा करावा लागला. या काळात जिल्ह्यातील विविध प्रश्न समजून घेत त्यावर प्रशासनाच्या पातळीवर कार्यवाही करण्याचा प्रयत्न केल्याचे धोडमिसे यांनी सांगितले.

“सिंधुदुर्गच्या नागरिकांचा सहभाग आणि सहकार्य हे प्रशासनासाठी महत्त्वाचे आहे. लोकशाही आणि विकासाची प्रक्रिया ही प्रशासन व नागरिकांच्या सहभागातूनच अधिक प्रभावी होते,” अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली. या पत्रकार परिषदेला उपजिल्हाधिकारी निवडणूक बालाजी शेवाळे उपस्थित होते.