
देवगड : गेल्या काही दिवसांपासून देवगड-बोरीवली ही एसटीची नियमित फेरी कोणतीही ठोस पूर्वसूचना न देता बंद करण्यात आल्याने मुंबईकडे प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. देवगड तालुक्यातील नागरिकांसाठी मुंबई गाठण्याचा हा सर्वात सोयीचा आणि विश्वासार्ह पर्याय मानला जात होता. मात्र ही फेरी बंद झाल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.
दरम्यान, कमी भारमानामुळे ही बसफेरी सध्या बंद करण्यात आली असून ऑगस्ट महिन्यापासून ही बसफेरी पूर्ववत सुरू करण्यात येईल, अशी माहिती आगार व्यवस्थापक सौरभ ओंधकर यांनी दिली. मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना ही फेरी बंद झाल्याने खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून त्यासाठी अधिक भाडे मोजावे लागत आहे. देवगड-बोरीवली बसफेरी पूर्ववत सुरू करावी, तसेच बंद असलेल्या इतर फेऱ्याही नियमित सुरू कराव्यात अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.










