
देवगड : सिंधुदुर्ग जिल्ह्यात लागू असलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून मिठमुंबरी बागवाडी येथील समुद्रकिनारी जलसमाधी आंदोलन आयोजित केल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, ठाकरे शिवसेनेचे सचिव व माजी खासदार विनायक राऊत, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, माजी आमदार वैभव नाईक व आंबा काजू बागायतदार व व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काका ढोके यांच्यासह आंबा बागायतदारांच्या संघटनेचे पदाधिकारी व आंदोलनात सहभागी झालेल्या विविध पक्षांचे नेते आदी २५ जणांवर देवगड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात लागु केलेल्या मनाई आदेशांचा भंग करून दिनांक ३ जुलै रोजी सकाळी ११.१५ ते दुपारी २ वाजेपर्यंत मिठमुंबरी बागवाडी येथील रमेश तारी यांच्या खेकडा प्रकल्पाजवळ समुद्रात जलसमाधी आंदोलन केल्याप्रकरणी स्वाभिामनी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू उर्फ देवाप्पा अण्णाप्पा शेट्टी, ठाकरे शिवसेना सचिव व माजी खासदार विनायक राऊत, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारे,आंबा काजू बागायतदार व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आनंद उर्फ काका ढोके, माजी आमदार वैभव नाईक, मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब,युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर, ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रवींद्र जोगल, शिंदे शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर, युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष उमेश कुळकर्णी, चंदन मेस्त्री, गणेश वाळके, रामानंद वाळके, स्वप्निल तोडणकर, अजय नाणेरकर, संजय आचरेकर, दिनेश धूवाळी, प्रसाद दुखंडे, शरद परब, धीरज घाडी, डॉ. मंगेश सावंत आणि राजेंद्र गड्याळवर आदी २५ जणांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ (पोलीस आयुक्त अथवा जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दलची शिक्षा), कलम ३७(१)(ई) (सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी विशिष्ट कृत्यांवर निर्बंध घालण्याचा अधिकार), कलम ३७(३) (कलम ३७ अंतर्गत जारी केलेल्या आदेशाची अंमलबजावणी व त्याचे पालन बंधनकारक असल्याची तरतूद) तसेच भारतीय न्याय संहिता कलम १८९(२) (शासकीय अधिकाऱ्याने विधिपूर्वक दिलेल्या आदेशाचे उल्लंघन), कलम १९० (बेकायदेशीर जमावासाठी प्रवृत्त करणे किंवा सहभागी होणे) आणि कलम २३३ (लोकसेवकाच्या कायदेशीर कर्तव्यात अडथळा निर्माण करणे किंवा विरोध करणे) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पो.कॉ. रवींद्र महाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.संशयितांनी समान उद्दीष्टे साधण्याकरीता बेकायदेशीर जमाव जमवुन जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचा भंग करून जलसमाधी आंदोलन केले असे फिर्यादीत म्हटले आहे.तपास स.पो.उपनिरिक्षक प्रवीण सावंत करीत आहेत.










