
कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या तब्बल सात सफाई कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. सणासुदीच्या काळातच रोजगार हिरावल्याने संबंधित कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले असून, त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त होत आहे.
कणकवली शहरातील स्वच्छतेची जबाबदारी मोठ्या प्रमाणात कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांवर आहे. अशा परिस्थितीत सात कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आल्याने शहरातील स्वच्छता व्यवस्थेवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. आधीच काही भागांमध्ये कचरा उचलण्याबाबत नागरिकांच्या तक्रारी असताना मनुष्यबळ कमी झाल्याने कचऱ्याचा प्रश्न आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, संबंधित कर्मचाऱ्यांना कामात टाळाटाळ करणे तसेच रिलीविंग असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये समावेश असल्याने कामावरून कमी करण्यात आल्याचे ठेकेदाराकडून सांगण्यात आले आहे. मात्र, अचानक कामावरून कमी केल्यामुळे कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून, सणासुदीच्या काळात कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा सवाल उपस्थित केला आहे.
नगरपंचायत प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची दखल घेऊन कर्मचाऱ्यांना कमी करण्यामागील कारणे, कंत्राटदाराची कार्यपद्धती तसेच शहरातील स्वच्छता व्यवस्थेवर होणारा परिणाम याबाबत योग्य ती चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.एकीकडे सणासुदीच्या काळात नागरिक स्वच्छ आणि सुंदर शहराची अपेक्षा करत असताना दुसरीकडे सफाई कर्मचाऱ्यांची संख्या कमी होत असल्याने कणकवलीतील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.










