आज इन्फंट्री डे (Infantry Day) | काय आहे इतिहास, जाणून घ्या !

भारतीय वैमानिकांनी अशक्य ते शक्य करून दाखवलं !
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: October 27, 2022 08:52 AM
views 257  views

२६ ऑक्टोबर १९४७ रोजी काश्मीरचे तत्कालीन महाराज हरी सिंह यांनी जम्मू-काश्मीरच्या भारतातील विलीनीकरणाच्या करारनाम्यावर सही केली खरी पण त्याआधीच पाक पुरस्कृत टोळीवाले श्रीनगरच्या दिशेने कूच करून येत होते आणि ते उरीपर्यंत पोचले देखील होते.


पाकिस्तानी सैन्याने ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच 'ऑपरेशन गुलमर्ग' या नावाने कारवाई चालू केली होती. या कारवाईत त्यांनी टोळीवाल्यांना आणि लुटारूंना हाताशी धरले होते. या टोळीवाल्यांनी काश्मीरमध्ये नुसता उच्छाद मांडला होता. महाराज हरिसिंगांनी या कृत्याचा निषेध नोंदवला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. आणि बघता बघता पाकिस्तानी सैन्याने २० ऑक्टोबर १९४७ ला या टोळीवाल्यांची बाजू घेऊन काश्मीरवर हल्लाबोल केला. जवळपास पाच हजार पाक पुरस्कृत टोळीवाल्यांनी अबोटाबाद मार्गे काश्मीर खोऱ्यावर आक्रमण केले. तो दिवस होता २२ऑक्टोबर १९४७.


२६ ऑक्टोबरला जम्मू-काश्मीरच्या विलीनीकरणावर महाराज हरिसिंगांनी स्वाक्षरी केली आणि स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे जाहीर केले. याच दिवशी भारताने काश्मीरवर झालेल्या हल्ल्या विरोधात लष्करी कारवाई करण्यास मान्यता दिली.


भल्या पहाटे २७ ऑक्टोबर १९४७ साली, फस्ट शीख बटालीयन नवी दिल्लीहून श्रीनगरला विमानाने आणून उतरवले होते. हे सगळं कशासाठी तर काश्मीर मध्ये घुसलेल्या पाक पुरस्कृत टोळीवाल्यांना आणि घुसखोरांना हुसकावून लावायला. ही संपूर्ण लष्करी कारवाई आपल्या सैनिकांनी (फक्त पायदळाने) चोख पार पाडली. 


आपल्या सैन्याला दिल्ली मधून श्रीनगरला विमानाने आणण्याची जबाबदारी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी वैमानिकांवर टाकली. त्या काळात, आपल्या देशात अनेक लहान खाजगी विमान कंपन्या होत्या आणि या कंपन्यांवर त्यांच्या विमानामधून लष्कर, त्यांची शस्त्र आणि अन्नसाठा श्रीनगरला पोचवण्याचे काम सोपवले होते. या नागरी वैमानिकांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला आणि श्रीनगरच्या तोकड्या धावपट्टीवर विमानं उतरवून सैनिकांची ने-आण केली. 


जगामध्ये कोणालाही अशक्य असा हा प्रयोग आपल्या वैमानिकांनी यशस्वी करून दाखवला. या फस्ट शीख बटालीयनने पराक्रमाची पराकाष्ठा करत श्रीनगर आणि परिसर वाचवला.


आपल्या सैनिकांनी पराक्रम गाजवलेल्या या दिवसाला तेव्हापासून 'इन्फंट्री डे' म्हणून ओळखले जाते. या दिवसाचं अजून एक महत्व म्हणजे आपण एक स्वतंत्र देश म्हणून आपल्यावर हल्ला केलेल्या देशाच्या विरोधात पहिल्यांदाच अशी सैनिकी कारवाई केली.