
सिंधुदुर्गनगरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आल्याने राज्यातील १२ जिल्हा परिषद व त्याअंतर्गत १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. यानुसार ५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणारे मतदान आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी, तर ७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणारी मतमोजणी आता ९ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे.
दरम्यान, हे दोन दिवस पुढे ढकलल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ फेब्रुवारी रोजी होणारी आंगणेवाडी जत्रा तसेच १० फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या बारावीच्या परीक्षा यांचा एकत्रित भार जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेवर येणार असून प्रशासनाची चांगलीच दमछाक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकांचा कार्यक्रम १३ जानेवारी २०२६ रोजी जाहीर केला होता. त्यानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करणे, अर्जांची छाननी, अर्ज मागे घेणे, चिन्ह वाटप तसेच अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे हे सर्व टप्पे पूर्ण झाले आहेत. आता मतदान, मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे शिल्लक आहेत.
या निवडणुकांसाठी मा. सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ नंतर केवळ दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी अपघाती निधन झाल्यानंतर राज्य शासनाने २८ ते ३० जानेवारी २०२६ दरम्यान राज्यात दुखवटा जाहीर केला. या कालावधीचा विचार करूनच निवडणूक कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांमध्ये आवश्यक बदल करण्यात आले आहेत.
यानुसार संबंधित जिल्हाधिकारी ३१ जानेवारी २०२६ रोजी सुधारित निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध करणार आहेत. सुधारित कार्यक्रमानुसार ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होईल. त्यामुळे जाहीर प्रचाराची समाप्ती ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १० वाजता होणार आहे.
९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू होईल. निकाल जाहीर होताच संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल, तर निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात ११ फेब्रुवारी २०२६ पर्यंत प्रसिद्ध केली जाणार आहेत.











