कणकवली विधानसभा मतदार संघातील जनतेला पालकमंत्री न्याय देणार का..?

शिवसेना नेते अतुल रावराणे यांचा सवाल
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: December 01, 2023 18:24 PM
views 176  views

वैभववाडी : जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे.याबाबत पालकमंत्र्यांनी आरोग्य यंत्रणेची बैठक घेऊन अधिकाऱ्यांना समज दिली. त्यांना त्यांच्या कामाची जाणीव करून दिली. पण कणकवली विधानसभेमध्ये तीनही तालुक्यातील आरोग्य यंत्रणा पुरती खिळखिळी झालेली आहे. याबाबत सातत्याने मागणी करूनही कोणतीही कार्यवाही होत नाही. पालकमंत्र्यांनी हे तीन तालुके आपल्या पालकमंत्री पदाच्या कार्य कक्षेतून वगळले आहेत का? असा सवाल शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी शासकीय मेडिकल कॉलेजच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली होती.तसेच अधिका-यांना कडक शब्दांत सुनावले होते.यावरुन शिवसेनेने मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर अतुल रावराणे यांनी टिका केली. कणकवली, देवगड व वैभववाडी तालुक्यातील आरोग्याच्या प्रश्नांबाबत गेल्या तीन महिन्यांपासून आपण पालकमंत्र्यांकडे मागणी करत आहोत. पण भाजपामध्ये घेतलेल्या  आमदार नितेश राणे यांचे लाड पुरविण्यासाठी पालकमंत्री हे तीन तालुके दुर्लक्षित करत आहेत का? पालकमंत्र्यांनी आपल्या कार्यकक्षेतून हे तालुके वगळले आहेत का ?असा सवाल करत श्री. रावराणे यांनी केला आहे. या मतदारसंघात अनेक विषय रेंगाळले आहे.वैभववाडी पंचायत समितीची इमारत गेल्या पाच वर्षापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. आतापर्यंत दोन पालकमंत्री होऊन गेले. आता तिसरे पालकमंत्री आले तरीही येथील आमदाराच्या हट्टापायी या इमारतीचे उद्घाटन होत नाही. ही जनतेशी केलेली प्रतारणा आहे. आरोग्य यंत्रणा सुधारण्याबरोबरच पालकमंत्र्यांनी हे प्रशासकीय आरोग्यही सुधारायला हवे. कणकवली, देवगड, वैभववाडी या तीन तालुक्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे ढेपाळली आहे.या तालुक्यात राहणारे नागरिकांना यांचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पालकमंत्र्यांनी या भागातील जनतेची काळजी घेणे गरजेचे आहे.

कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत तयार होऊन दीड वर्ष झाले ,तरी पण ती उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. जनतेच्या पैशातून उभारण्यात आलेल्या या इमारती केवळ निष्क्रिय आमदाराच्या हट्टा पायी किती काळ उद्घाटनाच्या प्रतीक्षेत ठेवणार ? असा सवाल श्री.रावरणे यांनी केला आहे.

या भागाच्या आमदाराने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचेकडून 200 कोटी रुपयांचा निधी आणला असे त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत. हा निधी वाटत त्या निधीची टक्केवारी घेण्यासाठी, रस्त्याची उद्घाटन करून टक्केवारी घेऊन जाण्यासाठी हे आमदार जिल्ह्यात येतात आणि जातात.  मग जनतेच्या अडचणी कोण सोडविणार? एका आमदाराचे लाड पुरवण्यासाठी त्यांच्या हट्टापाई आपण जनतेशी प्रतारणा करणार का? असा सवाल रावरणे यांनी उपस्थित केला आहे.