LIVE UPDATES

‌....तर त्याला महावितरण जबाबदार राहील

शांतता समिती बैठकीत मुद्दा ; वाहतूक कोंडीच्या समस्येवरूनही चर्चा
Edited by: विनायक गांवस
Published on: May 20, 2026 19:15 PM
views 20  views

सावंतवाडी : सावंतवाडीत सर्व धर्मीय नागरिक सण-उत्सव गुण्यागोविंदाने आणि शांततेत साजरे करतात. मात्र, सध्या  सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास वीज वितरण कंपनी जबाबदार राहील, याची नोंद घ्यावी असे शांतता समितीच्या सदस्यांनी चर्चेत स्पष्ट केले.बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी पोलीस ठाण्यात प्रभारी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या उपस्थितीत आयोजित शांतता समितीच्या बैठकीत हा सूर उमटला.

या बैठकीला माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी उपनगराध्यक्ष गोविंद वाडकर, सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. नकुल पार्सेकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, आगोस्तीन फर्नांडिस, हवालदार अमित राऊळ आदी उपस्थित होते. बैठकीत शांतता समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील विविध नागरी समस्यांकडे पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधले. सध्या कोणताही विजांचा कडकडाट किंवा पाऊस नसतानाही सकाळपासून वारंवार वीज खंडित केली जात आहे. यामुळे लोकांमध्ये मोठा उद्रेक असून सणासुदीच्या काळात शांतता भंग होऊ नये यासाठी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पूर्वानुभव लक्षात घेऊन खबरदारी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच याविषयी वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने कळवण्याची विनंती पोलीस निरीक्षकांना करण्यात आली. याशिवाय शहरातील इतर प्रमुख समस्यांवरही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. शहरात मोकाट कुत्रे आणि गुरांचा वावर वाढल्याने पादचारी व वाहनधारकांना मोठा त्रास होत आहे. पर्यटन हंगाम सुरू असल्याने शहरात बाहेरून येणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे गवळीतिठा, जयप्रकाश चौक, गांधी चौक आणि मुख्य बाजारपेठेत वाहतूक कोंडी होत आहे. नगरपरिषदेसमोरील बसस्थानक परिसरात वाहने उभी राहणार नाहीत, याची दक्षता घेऊन वाहतूक व्यवस्था सक्षम करावी, अशी मागणी करण्यात आली.

तसेच चिटणीसनाका येथील मोती तलावाच्या सांडव्याजवळ लावले जाणारे जाहिरात फलक न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवून हटवण्यात यावेत, याकडेही लक्ष वेधण्यात आले. पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी सावंतवाडीतील सर्व धर्मीय बांधव नेहमीच शांततेत सण साजरे करतात, या परंपरेचे कौतुक केले. तसेच बैठकीत उपस्थित करण्यात आलेल्या वीज, वाहतूक कोंडी आणि अन्य समस्यांबाबत संबंधित विभागांशी समन्वय साधून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.