सामाजिक बांधिलकीचा निराधार वृद्धाला आधार

Edited by: विनायक गांवस
Published on: October 11, 2025 11:05 AM
views 96  views

सावंतवाडी: सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या पुढाकाराने शिरोडा येथील निराधार वृद्धाला जिव्हाळा सेवाश्रम येथे आधार देण्यात आला. या देशात आश्रम आणि सामाजिक संस्था नसत्या तर या निराधार वृद्धांच काय झालं असतं, हा एक गंभीर प्रश्न आहे.   सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज कित्येक निराधार वृद्धांना आश्रमत आश्रय मिळून दिला. पण असा आश्रय मिळवून देताना त्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून आमचेही डोळे पाणावतात असे उद्गार रवी जाधव यांनी काढले. 

 

चार दिवसापूर्वी एका निराधार वृद्धाला तर कालच शिरोडा व माजगाव सावंतवाडी येथे निराधार वृद्धाला सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने आश्रय मिळवून दिला. भालचंद्र शिरोडकर वय वर्ष 65  यांना मुलं नसल्याने पत्नीच्या निधनानंतर ते पूर्णपणे अनाथ झाले. ते माजगाव येथील एका पाईप कंपनीमध्ये काम करत होते. माजगाव येथील दुकानदार सुरेश मांजरेकर यांच्याशी त्यांची जुनी मैत्री होती. त्यांच्या दुकानात ते नेहमी बसायचे. परंतु, काही वर्षांपूर्वी सुरेश मांजरेकर यांचे निधन झाले. त्यांच्या तोही आधार हरपला.  मागील दोन वर्षांपूर्वी वृद्धपणाने त्यांचे कामही सुटले. या परिस्थितीत त्यांचे खूप हाल झाले. अखेर नाईलाज म्हणून ते पुन्हा आपले मित्र मांजरेकर यांच्या घरी आले. त्यांच्या मुलीला विनंती केली काही दिवस मला येथे थांबू द्या अन्यथा मला कुठच्यातरी आश्रम मध्ये भरती करा. आपल्या वडिलांचे मित्र म्हणून व त्यांच्या विनंतीला मान देऊन मांजरेकर यांच्या मुलीने एक महिना त्यांना आपल्या घरात आश्रय दिला. त्यांच्या इच्छेनुसार आश्रमात आश्रय देण्याकरिता ती प्रयत्न करू लागली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते उमा वारंग यांनी रवी जाधव यांच्याशी संपर्क साधला असता सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या हेलन निबरे व रूपा गौंडर  (मुद्राळे) यांनी पुढाकार घेऊन रवी जाधव, रूपा मुद्राळे व लक्ष्मण कदम ते आश्रय घेत असलेल्या घरी गेले. त्यावेळी त्यांनी  सर्व हकीकत सांगितली. जवळचे खूप आहे पण म्हातारपणी मला साथ देणारा असा कोणी नाही. मी फार दमलो, आता हात पाय काम करत नाहीत. मला कुठच्यातरी आश्रमामध्ये टाका. मांजरेकर कुटुंबाचे माझ्यावर खूप मोठे उपकार आहेत. त्यांना अजून त्रास देणे योग्य वाटत नाही. काहीतरी करा माझ्यासाठी तुमचे फार उपकार होतील असे त्यांनी सांगितले.  त्यांचे हे शब्द मन हेलावून टाकणारे होते. यानंतर सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान माध्यमातून त्यांना नवीन कपडे घेऊन देत तसेच हात-पाय दुखी आजारपणावर रूपा गौंडर ( मुद्राळे ) यांनी  त्यांच्यावर डॉक्टर उपचार करून औषध गोळ्यांची व्यवस्था केली. काल संध्याकाळी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव,हेलन निबरे व लक्ष्मण कदम यांच्या सहकार्याने त्यांना कुडाळ पिंगुळी माड्याचीवाडी येथील  जिव्हाळा सेवाआश्रम मध्ये भरती करण्यात आले.