
सावंतवाडी : समाजात 'कोणीतरी करेल' ही मानसिकता सर्वत्र दिसून येते. मात्र, 'ते आपण का करू नये' हा विचार करून ध्येयाने झपाटून काम करणाऱ्या लोकांची आज देशाला गरज आहे. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने जे सेवाभावी काम होत आहे, त्याला खरोखरच तोड नाही," अशा शब्दांत मुंबईच्या माजी महापौर निर्मला सामंत प्रभावळकर यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचा गौरव केला.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या निस्वार्थ सेवेची दखल घेत त्यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रतिष्ठानच्या कार्याला 'ईश्वरी कार्य' संबोधले. त्या म्हणाल्या की, समाजासाठी काहीतरी करण्याची ओढ असणे ही काळाची गरज आहे. "बहुतेक लोक विचार करतात की कोणीतरी पुढाकार घेईल. पण, जर समाजातील केवळ १० टक्के लोकांनी 'हे काम मी का करू नये?' असा विचार केला, तर खूप मोठे परिवर्तन घडून येईल.
हे कार्य अत्यंत खडतर असून ते ईश्वराच्या कृपेने तुमच्या हातून घडत आहे, असे सांगत त्यांनी प्रतिष्ठानला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यात आपली कशी मदत होईल, ते नक्की कळवा," असे म्हणत त्यांनी आपल्या सक्रिय सहभागाचा विश्वासही दिला.











