LIVE UPDATES

मालवणात राखणदार पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

जल, जंगल, जमीन वाचविण्यासाठी लढा
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 20, 2026 11:41 AM
views 99  views

मालवण : आपले जल, जंगल, जमीन वाचविण्यासाठी आपणच राखणदार बनावे, असा संदेश देत आज मालवणमध्ये रानमाणूस प्रसाद गावडे व त्यांच्या टीममार्फत राखणदार पदयात्रा काढण्यात आली. वायरी येथील मोरयाचा धोंडा ते राजकोट किल्ला अशा किनारी भागातून काढलेल्या या पदयात्रेला मालवणमधील पर्यावरण प्रेमी, पारंपारिक मच्छिमार यांनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

पर्यावरण रक्षण तसेच जंगल, जमीन, नद्या, समुद्र, प्राणी, पक्षी वाचविण्यासाठी, आपली पारंपारिक संस्कृती व जीवनशैली टिकवून ठेवण्यासाठी आपण स्वतःच राखणदार बनून हे सर्व वाचविले पाहिजे असा विचार घेऊन सर्वत्र जनजागृती करण्यासाठी सिंधुदुर्गातील रानमाणूस म्हणून प्रसिद्ध असणारे प्रसाद गावडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरात राखणदार पदयात्रा काढण्यात येत आहे. या पदयात्रे अंतर्गत आज मालवण शहराच्या किनारी भागातून पदयात्रा काढण्यात आली. वायरी मोरेश्वर किनाऱ्यावरील ऐतिहासिक मोरयाचा धोंडा देवस्थान येथे गाऱ्हाणे घालून या पदयात्रेस सुरुवात झाली. किनारी वस्ती मधून वाटचाल करत दांडी येथील श्रीकृष्ण मंदिरला भेट देऊन गाऱ्हाणे घालत पर्यावरण रक्षणाची गाणी म्हणण्यात आली. तसेच यावेळी पारंपारिक मच्छिमारांशी संवाद साधत त्यांना भेडसावणारे प्रश्न, अनधिकृत व अतिरेकी मासेमारी विरोधात त्यांचा सुरु असलेला लढा याविषयी माहिती जाणून घेण्यात आली. यावेळी पारंपारिक मच्छिमारांनी समुद्र व त्यातील जीवांचे रक्षण होणेही महत्वाचे असल्याचे सांगत राखणदार यात्रेला आपला पाठिंबा दर्शविला. यानंतर दांडी येथील दांडेश्वर मंदिराला भेट देऊन तेथेही गाऱ्हाणे घालण्यात आले.

किनाऱ्यावरून मार्गक्रमणा करत गवंडीवाडा येथील गणेश येशू मंदिरालाही भेट देऊन गाऱ्हाणे घालण्यात आले. त्यानंतर बाजारपेठेत प्रवेश करून मच्छी मार्केट येथे मच्छी विक्रेत्या महिलांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेण्यात आले. त्यानंतर मेढा भागातून मार्गक्रमणा करत मेढा येथील मुस्लिम धर्मीयांच्या पिराचा दर्गा येथे भेट देऊन गाऱ्हाणे घालण्यात आले, तसेच मुस्लिम बांधवांशी संवाद साधत पर्यावरण रक्षणाविषयी जागृती करण्यात आली. 

यानंतर राजकोट किल्ल्याला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज यांनी जल, जंगल, जमीन वाचविण्याबाबत दिलेल्या आज्ञापत्राचे वाचन करण्यात आले. या पदयात्रेत राखणदार टीमचे सदस्य, वाढवण बंदर प्रकल्प विरोधी समितीचे पदाधिकारी, मालवण मधील इकोमेट्स व युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्थेचे सदस्य, पारंपारिक मच्छिमार, मुंबई, मालवण व जिल्ह्यातील पर्यावरण प्रेमी सहभागी झाले होते.