
सिंधुदुर्गनगरी : राज्य शासनाने शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' जाहीर करून राज्यातील लाखो शेतकरी बांधवांना मोठा दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेची उद्दिष्टे, पात्रता, निकष, लाभाची प्रक्रिया तसेच शेतकऱ्यांच्या मनातील विविध प्रश्नांची सविस्तर माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्गच्या वतीने आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी केंद्रावर विशेष मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या विशेष मुलाखतीमध्ये सहाय्यक निबंधक सुनील मरगळ यांनी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' संदर्भातील विविध महत्त्वपूर्ण बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले आहे. योजनेचे उद्दिष्ट, लाभार्थी निवडीचे निकष, पात्रता तसेच शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लाभांविषयी त्यांनी सोप्या आणि स्पष्ट शब्दांत माहिती दिली आहे. त्यामुळे या योजनेबाबतची अचूक आणि अधिकृत माहिती जाणून घेण्यासाठी ही मुलाखत शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
ही मुलाखत जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी घेतली असून तिचे प्रसारण गुरुवार, दि. २ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता आकाशवाणीच्या सिंधुदुर्गनगरी वाहिनीवर करण्यात येणार आहे. याशिवाय श्रोत्यांना ही मुलाखत एफ.एम. १०३.६ मेगाहर्ट्झवर तसेच NewsOnAir या मोबाईल ॲपद्वारेही ऐकता येणार आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकरी, कृषी क्षेत्राशी संबंधित व्यक्ती तसेच नागरिकांनी या विशेष मुलाखतीचा लाभ घेऊन शासनाच्या महत्त्वपूर्ण कर्जमुक्ती योजनेविषयी अधिकृत माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.












