
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलीत श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी( स्वायत्त) येथे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर सागरी पर्यावरण केंद्र, मालवण यांच्यावतीने पी एम उषा स्कीमच्या अंतर्गत सागरी जैवविविधता व त्याचे भवितव्य या विषयावर तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याध्यक्षा राणीसाहेब शुभदादेवी भोंसले यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे कार्यकारिणी सदस्य जयप्रकाश सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी एल भारमल, शिवाजी विद्यापीठ सागरी पर्यावरण केंद्र मालवणचे समन्वयक डॉ. नितीन कांबळे तसेच प्रमुख वक्ते डॉ. ज्योतीप्रकाश यादव डॉ. अण्णा गोफणे, डॉ. विश्वजीत लगाडे, महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. यु एल देठे, प्राणी शास्त्र विभाग प्रमुख डॉ. जी एस मर्गज, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. डी बी शिंदे, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वाय ए चौधरी, भूगोल विभाग प्रमुख डॉ. एस एम बुवा, महाविद्यालयाच्या प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तावीक महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ .डि.एल.भारमल यांनी केले.
व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी शिवाजी विद्यापीठ इन्स्ट्रुमेंट सेंटरचे प्रमुख डॉ. ज्योतीप्रकाश यादव यांनी संशोधनामध्ये प्लॅगेरीझम या विषयावर व्याख्यान दिले. यामध्ये संशोधन पत्रिकेमध्ये रिसर्च पेपर्स पब्लिश करताना त्या रिसर्च पेपर ची मांडणी स्वतः करणे गरजेचे असते, इथे त्यांनी केलेल्या संशोधनाच्या कॉफीचा प्रतिबंध करण्यासाठी प्लॅगेरिझम अॅपच्या साह्याने ती चोरी पकडता येते. जेणेकरून संशोधन हे इनोव्हेटिव्ह असायला हवेँ असे ते म्हणाले. डॉ.विश्वजीत लगाडे ,वाय पी एस सी कॉलेज, सोळांकुर यांनी स्कुबा ड्रायव्हिंग चे प्रकार व उपयोग या विषयावर व्याख्यान दिले .त्यांनी स्कुबा ड्रायविंग चे महत्व विशद केले. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण येथे प्रवाळांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे व ते बघण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्कुबा ड्रायव्हिंग चे प्रशिक्षण घेणे हे विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या वाटा दाखवणारे आहे असे ते म्हणाले. शिवाजी विद्यापीठ प्राणीशास्त्र विभागाचे डाॅ.अण्णा गोफणे यांनी रेशीम उत्पादन या विषयावर सादरीकरण केले. रेशीम किडे संगोपन व रेशीम उत्पादन हे खूप फायद्याचे आहे. यामध्ये जास्तीत जास्त तरुणांनी सहभागी व्हायला हवे असे ते म्हणाले.
व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी डॉ. गजानन राशिनकर, रसायनशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, यांनी संशोधना मधील नाविन्यता तथा इनोवेशन या विषयावर सादरीकरण केले. त्यांनी संशोधनातील नाविन्यपूर्णतेमुळेच त्याकाळची गरज ओळखून नवनवीन शोध लावण्यात आले. त्यामुळेच मानवाचे जीवन सुखकर झालेले आहे, असे ते म्हणाले. शिवाजी विद्यापीठ भूगोल विभागाच्या डॉ. मीना पोद्दार यांनी संशोधन या विषयावर सादरीकरण केले भूगोल विषया सोबतच विज्ञानाच्या अनेक विषयांमध्ये कसे संशोधन केले जाते याबद्दलची माहिती त्यांनी दिली. सागरी पर्यावरण केंद्र मालवण चे समन्वयक व प्राणीशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर चे डॉक्टर नितीन कांबळे यांनी ब्रेस्ट कॅन्सर या विषयावर व्याख्यान दिले. आजच्या घडीला कॅन्सरचे वाढलेले प्रमाण आणि त्याला कारणीभूत घटक याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. व्याख्यानमालेच्या तिसऱ्या दिवशी शिवाजी विद्यापीठ बायोकेमिस्ट्री विभागप्रमुख डॉ. कैलास सोनवणे यांनी ह्यूमन जीनोम प्रोजेक्ट, ज्यामध्ये डीएनएची कार्यप्रणाली या विषयांमध्ये जगामध्ये चाललेले संशोधन या विषयावर व्याख्यान दिले .डॉ. सचिन पन्हाळकर, भूगोल विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी जागतिक तापमान बदल याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिवाजी विद्यापीठ वनस्पती शास्त्र विभागाच्या डाॅ. वर्षा राठोड यांनी वनस्पती शास्त्रामध्ये संशोधनाच्या व नोकरीच्या संधी या विषयावर व्याख्यान दिले. कार्यक्रमाचा समारोप समारंभ संस्थेच्या कार्याध्यक्षा राणीसाहेब सौ. शुभदादेवी भोंसले यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. जी एस मर्गज यांनी केले व आभार मानले.











