
देवगड : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला...’ अशा जयघोषात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तांनी भावपूर्ण निरोप दिला. देवगड तालुक्यात ठिकठिकाणी दीड दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन उत्साहात करण्यात आले.
विसर्जनस्थळी गणरायासमोर आरती करून भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. यावेळी भक्तांच्या चेहऱ्यावर उत्साहासोबतच बाप्पाला निरोप देतानाची भावुकताही पाहायला मिळाली. देवगड बंदर, आनंदवाडी, किल्ला, मळई, वाडातर, मोर्चा, मिठबांव, कुणकेश्वर, मिठमुंबरी आदी खाडीकिनारी भागात भक्तांनी लाडक्या बाप्पाचे विसर्जन केले. दीड दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी विविध ठिकाणी भक्तांची गर्दी झाली होती. पारंपरिक पद्धतीने आरती, जयघोष आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला.











