
देवगड : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवगड तालुक्यातील गौण खनिजांची वाहतूक १० ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत बंद करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना पक्षाचे देवगड तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी तहसीलदार तथा दंडाधिकारी, देवगड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, देवगड तालुक्यात दररोज गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या सुमारे १०० ते १२५ गाड्या धावत असतात. याच काळात १४ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत असून, देवगड तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चाकरमानी आपल्या खासगी वाहनांनी दाखल होतात.
गणेशोत्सवासाठी बाहेरून येणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने देवगड-निपाणी रस्ता वाहनांनी गजबजणार आहे. अशा परिस्थितीत गौण खनिज वाहतूक करणारी अवजड वाहनेही मोठ्या प्रमाणात व अतिवेगाने धावत असल्याने अपघातांचा धोका वाढण्याची शक्यता निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
यापूर्वीही अवजड वाहनांमुळे निरपराध नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊन हानी झाल्याचा अनुभव आहे. त्यामुळे नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन १० सप्टेंबर ते २७ सप्टेंबरदरम्यान गौण खनिजधारकांना तात्काळ सूचना देऊन अवजड वाहनांची वाहतूक बंद करावी, अशी मागणी विलास साळसकर यांनी केली आहे.










