
सावंतवाडी : तालुक्यातील चौकुळ गावातील मऱ्हाटवाडी-बेरडकी येथे शनिवारी मध्यरात्री निसर्गाने अक्षरशः थैमान घातल्याने येथील गरीब कुटुंबांची घरे काही क्षणांत उद्ध्वस्त झाली. माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या उपस्थितीत या नुकसानीची पाहणी करत नुकसानग्रस्तांना धीर दिला. पालकमंत्री नितेश राणे यांनी देखील तहसीलदारांशी संवाद साधत मदतीची ग्वाही दिली.या वादळात येथील गरीब कुटुंबांचे आयुष्यभराचे कष्ट काही मिनिटांत मातीमोल झाले. मध्यरात्री गाढ झोपेत असताना अचानक वादळाने झोडपायला सुरुवात केली. जुनी, मातीची व कौलारू घरे असल्याने वादळाचा सर्वाधिक फटका या कुटुंबांना बसला. याची माहिती मिळताच आज माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी बेरडकीत जात नुकसानीची पाहणी केली. यावेळी तहसीलदार श्रीधर पाटील देखील उपस्थित होते. आम. श्री. केसरकर यांनी यावेळी नुकसान ग्रस्तांना धीर देत भरपाई देण्याचा शब्द दिला. आपण तुमच्या सोबत असून घाबरून न जाण्याचे आवाहन केले.
दरम्यान, नुकसानीची पहाणी केली असता तीन घरांचे पुर्णतः नुकसान झाले आहे. तर इतर घरांचे अंशतः नुकसान झाले असून नुकसानीचे पंचनामे चौकुळ तलाठी संदीप मुळीक यांनी काल सायंकाळी केलेलं आहेत, अशी माहिती तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिला. या पहाणी दरम्यान माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर, तहसीलदार श्रीधर पाटील, पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा, मंडळ अधिकारी संजय यादव, ग्राम महसूल अधिकारी संदिप मुळीक आदींसह महसुलचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.











