
सावंतवाडी : वाढदिवस हा केवळ केक कापून किंवा शुभेच्छा स्वीकारून साजरा करण्याचा दिवस नसून समाजातील वंचित, गरीब व निराधार मुलांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण करण्याची संधी आहे. या मुलांच्या डोळ्यातील समाधान, त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले निरागस हास्य आणि त्यांना मिळालेला आधार हाच माझ्यासाठी सर्वात मोठा आशीर्वाद आहे. समाजातील प्रत्येक सक्षम व्यक्तीने अशा गरजूंसाठी हात पुढे केला, तर अनेकांचे आयुष्य उजळून निघेल, असे प्रतिपादन सावंतवाडीच्या माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांनी रोणापाल येथे केले.
अन्नपूर्णा सेवा फाऊंडेशन सावंतवाडी यांच्या वतीने रोणापाल येथील दयासागर छात्रालयातील मुलांना जीवनावश्यक वस्तू तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. अन्नपूर्णा कोरगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त हा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्रीमती कोरगावकर बोलत होत्या. यावेळी युवा उद्योजक अखिलेश कोरगावकर, ऐश्वर्या कोरगावकर, संदेश पाटील, नीलेश मोरजकर, प्रवीण परब, मृणाली वाडकर, जयदेव डोलारकार, शीतल डिसोजा, रिया मुळीक आदी मान्यवर उपस्थित होते. छात्रालयाचे व्यवस्थापक जिवबा वीर यांनी सर्वांचे स्वागत करून आभार मानले.यावेळी त्यांनी छात्रालयाची माहिती दिली. दयासागर छात्रालयात गरीब, गरजू व निराधार मुलांचा समावेश असून त्यांचा सेवाभावी वृत्तीने सांभाळ करण्यात येतो. या उपक्रमामुळे मुलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून उपस्थितांनी अन्नपूर्णा सेवा फाऊंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. अखिलेश कोरगावकर यांनी यापुढेही फाऊंडेशनच्या माध्यमातून छात्रालयाला भौतिक व शैक्षणिक सुविधासाठी सहकार्य करण्याची ग्वाही यावेळी दिली.












