पालघर जिल्ह्यात पुन्हा टॅंंकरवाऱ्या ! जव्हार, मोखाडा तालुक्यात जानेवारीपासूनच आटल्या विहिरी

एप्रिल आणि मे महिन्यापर्यंत ग्रामीण भागात पाण्याचे संकट तीव्र होण्याची भीती
Edited by: प्रतिनिधी
Published on: March 10, 2023 17:10 PM
views 175  views

पालघर : पालघर जिल्ह्यातील दुर्गम, आदिवासी मोखाडा व जव्हार तालुक्यातील भूजल पातळी खाली गेल्याने विहिरी कोरड्या पडल्या आहेत. यामुळे जानेवारी महिन्यापासूनच मोखाड्यात पाणीटंचाई सुरू झाली आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी या दोन्ही तालुक्यांमध्ये टँकर सुरू करण्यात आले आहेत. जानेवारीतच पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्याने, एप्रिल आणि मे महिन्यापर्यंत ग्रामीण भागात पाण्याचे संकट तीव्र होण्याची भीती व्यक्त होत आहे.


पालघरमध्ये वाढत्या तापमानामुळे ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण होऊ लागली आहे. जानेवारी, फेब्रुवारीपासूनच येथील पाणी आटण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पाण्याच्या शोधासाठी लांबपर्यंत जावे लागत आहे. मोखाडा तालुक्यात ११ गावांना आठ टँकरद्वारे २२ फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे, तर जव्हार तालुक्यात दोन टँकरद्वारे चार फेऱ्यांत पाणीपुरवठा केला जात आहे. एकूण १० टँकरद्वारे २६ गावपाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. पुढील तीन महिन्यांत येथील पिण्याच्या पाण्याचे संकट अधिक गंभीर होणार आहे. शेकडो गावांना पाणीटंचाई भेडसावणार असून ६० हून अधिक गावांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.


मोखाडा तालुक्यात चास, आसे, पाथर्डी, नशेरा, स्वामीनगर, किनस्ते, निळमाती, स्वामी नगर, शास्त्री नगर, वशाळा धामणी, सातुर्ली या गावांतील दापटी १ व २, हेदवाडी, ठवळ पाडा, हट्टीपाडा, गवरचरी पाडा, कुडाचा पाडा, हिंबट पाडा, मडक्याची मेट, आंब्याच्या पाडा, वारघड पाडा, भोईरपाडा व घामोडी आदी १८ गावपाड्यांत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जव्हार तालुक्यातील रायतळे, वावर वांगणी या दोन गावांतील खरंबा व रेठी पाडा येथे टँकर सुरू आहेत.


मोखाडा तालुक्यात लहानमोठी ९३ गावे आहेत. येथील लोकसंख्या ५० हजारांहून अधिक आहे. मार्च ते जून या कालावधीत दररोज ८० ते ९० टँकरने येथील लोकांना पाणी पुरवले जाते. पण लोकसंख्येच्या मानाने टँकरचे पाणी अपुरे आहे. येथील लोकांसाठी नद्या, विहिरी, झरे आणि तलाव हेच पाण्याचे स्रोत आहेत. तरीही महिला व बालकांना पामी भरण्यासाठी अनेक किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. काही जण यासाठी बैलगाडीचा, सायकलचाही वापर करत आहेत.




केंद्र सरकारच्या ‘जल जीवन मिशन’च्या ‘हर घर जल, हर घर नल’ योजनेअंतर्गत गावांमध्ये पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याचे अनेक दावे केले जातात. मात्र पालघरच्या आदिवासी भागात कोट्यवधी रुपये खर्च करूनही लोकांना पिण्याचे पाणी मिळालेले नाही. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातही आदिवासी भागातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.


टँकरद्वारे एका गावाला दिवसाला बाराशे लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेल्या मोखाडा तालुक्यातील गावपाड्यांत सात हजार ४८५ लोकसंख्या असून दोन हजार ७६० जनावरे आहेत. तर जव्हार तालुक्यातील गावपाड्यांची लोकसंख्या एक हजार २२९ असून ६२८ जनावरे आहेत. या लोकसंख्येला व पशुधनाला हा पाणीपुरवठा अपुरा पडत आहे.



कंत्राटदार व पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने गावागावांत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजना भ्रष्टाचाराच्या बळी ठरल्या आहेत. पिण्याच्या पाण्याच्या योजना वर्षानुवर्षे येथे लटकत आहेत. प्रत्यक्षात जमिनीवर कोणतेही काम होत नाही. आदिवासींना आजही तहान भागवण्यासाठी अनेक किलोमीटर भटकंती करावी लागते.- प्रदीप वाघ, उपसभापती, मोखाडा पंचायत समिती