कणकवली : राणेंनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला तर नाईक कुटुंबिय आणि मराठा बांधव स्वतः पुढाकार घेऊन पुढील २ वर्षात मराठा मंडळ इमारत उभारतील असे युवासेना कणकवली तालुकाप्रमुख उत्तम लोके यांनी सांगितले. त्याचबरोबर आम्ही विचारलेल्या प्रश्नांना बगल देण्यापेक्षा प्रश्नोत्तरासाठी तारीख वेळ आणि ठिकाण युवामोर्चाने ठरवावी युवासेना केव्हाही तयार असल्याचे आव्हानही त्यांनी दिले आहे.
उत्तम लोके पुढे म्हणाले, संदीप मेस्त्री यांना देखील सभेत बोलवावे असे काही शिवसैनिकांचे म्हणणे होते मात्र त्याठिकाणी अनेकांच्या नवनवीन गाड्या होत्या आणि गाडयांना टायर देखील होते ते गायब होतील याची आम्हाला भीती होती म्हणूनच आम्ही त्यांना बोलावणे टाळले. असा टोला उत्तम लोके यांनी लगावला आहे.
पुलाखाली बसणाऱ्यांकडून पत्रकार परिषदेची स्क्रिप्ट घेऊन राजकारण करताना टायर प्रकरण याच पुलाखाली बसणाऱ्या लोकांनी उघडकीस आणले होते याचीही माहिती संदीप मेस्त्री यांनी ठेवावी. सुशांत नाईक यांनी त्यांच्या वॉर्ड मध्ये किती विकास कामे केली हे तुमच्या माजी नगराध्यक्षांनाच विचारा तुमच्या लोकांनी सांगितलेल्या आकड्यांवरच तुमचा विश्वास बसेल.
सुशांत नाईक यांनी तुमच्या आमदारांना केवळ १० प्रश्नच विचारले आहेत. त्याच प्रश्नांची उत्तरे त्यांनी द्यावीत. त्यातील मुद्यांना बगल देऊन प्रश्नांच्या उत्तरांपासून पळ काढू नका. युवा मोर्चा या प्रश्नांची उत्तरे देत असतील तर त्यांनी तारीख वेळ आणि ठिकाण युवामोर्चाने ठरवावे युवासेना केव्हाही तयार आहे. मग ३ तालुक्यांची युवासेना भारी ठरते कि ८ तालुक्यांचा युवा मोर्चा ते समजेल असे आव्हान उत्तम लोके यांनी दिले आहे.