
वेंगुर्ले: नारळ पीक आज शाश्वत आहे. संपूर्ण कोकण हे नारळशेतीसाठी पुरक असून काही जुन्या संकल्पना मोडीत काढून शेतकऱ्यांनी नारळ शेती व्यावसायिक रित्या करावी. बदलत्या हवामानामुळे आंबा व काजू पिकांचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी तसेच तरुण-तरुणींनी नारळशेती, नारळप्रक्रिया या उद्योगांकडे वळून स्वतःची आर्थिक उन्नती केली पाहिजे. यासाठी लवकरच भव्य कृषी मेळावा आयोजित करणार असल्याचे कृषीभूषण तथा एम के कॉयर क्लस्टर अध्यक्ष एम. के. गावडे यांनी सांगितले.
नारळ विकास बोर्ड राज्य केंद्र ठाणे व महिला काथ्या कामगार औद्योगिक सह. संस्था सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित नारळमित्र प्रशिक्षणच्या उदघाटन कार्यक्रमवेळी एम के गावडे बोलत होते. या प्रशिक्षणाचे उदघाटन गटविकास अधिकारी मोहन भोई यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी नारळ बोर्डाचे रिजनल मॅनेजर शरद आगलावे, खरेदी विक्री संघाच्या व्हा. चेअरमन प्रज्ञा परब, तज्ञ प्रशिक्षक रुपेश तांबडे, अश्विनी पाटील, अरुणा परब, वृषाली चिककर यांच्यासाहित प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
या प्रशिक्षणात कोणकोणत्या नारळ जाती किती व कशा लावायच्या, नारळाच्या झाडांवर येणाऱ्या रोजचे निर्मुलन, अधिक पीक असे घ्यायचे याची माहिती तसेच नारळाच्या झाडावर चढायचे सर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याचबरोबर या प्रशिक्षणात शिकवली जाणारी सर्व माहितीची एक पुस्तिका दिली जणार आहे. तर प्रशिक्षण घेतल्याना नारळाच्या झाडावर चढायची मोफत शिडी दिली जाईल असे यावेळी प्रज्ञा परब यांनी सांगितले.