कुडाळ : महिलांची एकजूट हीच त्यांची खरी ताकद आहे. महिलांनी एकत्र येत ठरवलं तर काहीही घडू शकतं त्यामुळे महिलांनो दुसऱ्याची चूक काढण्यात आपली ताकद वाया घालवू नका तुम्ही महिला या देशाची उमेद आहात, लोकशाही बळकट करण्यासाठी या देशाची ताकद बना जबाबदार नागरिक बना असे आवाहन कुडाळ गट विकास अधिकारी विजय चव्हाण यांनी आज वेताळ बांबर्डे ग्रामपंचायत आयोजित श्रावण वेळा कार्यक्रमानिमित्त बोलताना केले. विजय चव्हाण या कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते
वेताळ बांबर्डे ग्रामपंचायतच्या वतीने श्रावणमेळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, वेताळ बांबर्डे सरपंच वेदिका दळवी, उपसरपंच प्रदीप गावडे, पोलीस पाटील दिपाली कुबल, अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्राप्त स्नेहा दळवी, सुप्रिया पवार ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक शिक्षक, आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविका उपस्थित होते.
या कार्यक्रम प्रसंगी बोलताना गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी आपला देश स्वतंत्र झाला आहे पण आपल्या देशात सुराज्य नांदायचे आहे, हे सुराज्य नांदण्याची ताकद आपल्या महिलांमध्ये आहे, सुराज्य आणायचं असेल तर आपल्याला पुन्हा संग्राम मांडावा लागेल. त्यासाठी सर्व महिलांनी आपला मतदानाचा अधिकार प्रत्येक मतदानावेळी बजावा. पाळण्याची दोरी आपल्या हातात असली म्हणून काय झालं देशाची ही दोरी आपल्या हातात असायला हवी असे यावेळी चव्हाण म्हणाले.
या कार्यक्रमाला उपस्थित असलेले उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांनी, गावात पक्ष कोणताही असावा मात्र तो इलेक्शन पुरता असावा एकदा मतदान झालं की गावातील ग्रामपंचायत सदस्य सरपंच हे पक्षाचे नसावे ते गावाचे असावेत, तरच आपल्या गावाचा विकास होऊ शकतो, पाटोदा राळेगणसिद्धी हिवरे बाजार या ग्रामपंचायत मध्ये महिलांचा सहभाग शंभर टक्के आहे त्यामुळे या ग्रामपंचायती राज्यस्तरावर पुरस्कार घेत आहेत. श्रावण मेळा कार्यक्रमासाठी महिलांनो 100% उपस्थित राहिलात तशीच उपस्थिती ग्रामसभांना ही, लावा गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. असं प्रतिपादन विनायक ठाकूर यांनी केलं..
या श्रावण वेळा कार्यक्रमाच्या निमित्ताने रान भाजी व रानभाज्यांपासून बनवलेल्या पदार्थांचे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. तर यावेळी ग्रामपंचायत वेताळ बाबर्डे आयोजित श्रावण मेळा कार्यक्रमाचे औचित्य साधत 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत साजरा होत असलेल्या पोषण महा निमित्ताने पोषण शपथ घेण्यात आली. ही शपथ अंगणवाडी सेविका शुभदा गावडे यांनी दिली. यावेळी श्रावण मेळा व सही पोषण देश रोषण या घोषवाक्यांनी बांधण्यात आलेली हंडी फोडण्यात आली.
वेताळ बाबर्डे ग्रामपंचायत आयोजित श्रावण मेळा या कार्यक्रमात महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, तर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाने या श्रावण वेळा कार्यक्रमात रंगत आणली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक बादल चौधरी यांनी केलं.