सावंतवाडी : भारतीय स्त्री समोर आजही भरपूर प्रश्न उभे ठाकले आहेत. पुरुषसत्ताक व्यवस्थेत स्त्रीयांनाच जबाबदार धरले जाते. स्त्रीया पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असल्या तरीही स्त्रीयांना अधिकार नाहीत अस विधान पुणे येथील स्त्री रोग तज्ञ व साहित्यिक डॉ. ऐश्वर्या रेवडकर यांनी केले.
त्या म्हणाल्या, बाह्य जगात फिरताना स्त्रीयांच्या डोक्यावर संस्कृतीचे ओझे असते. त्यामुळे स्त्रीयांना लैंगिक शिक्षणाची गरज आहे. स्त्री पर्यंत कोणती माहिती पोहचवावी आणि कोणती माहिती पोहचणार नाही अशी खबरदारी घेतली जाते. राजकीय वक्तव्य पाहता स्त्रीवादी म्हणून खंत वाटते. हातात बांगड्या भरल्या का? असे पुरूषसत्ताक व्यवस्थेत स्त्रीयांविषयक भावना निर्माण होतात. पुरुष आणि स्त्री विषयक भूमिका मांडताना स्त्री बाबतीत विचित्र भूमिका मांडली जाते हे चित्र दुर्दैवी आहे. लैंगिक अत्याचार झाला तर स्त्री सांगत नाही. कारण, पुरुषसत्ताक व्यवस्थेत स्त्रीयांनाच जबाबदार धरले जाते. स्त्रीची इज्जत योनीमध्ये नाही हे लक्षात घेऊन स्त्री बाह्य जगात फिरत असते. त्यामुळे स्त्रीला अशा विविध विषयांवर जागृत करताना लैंगिक अत्याचाराबाबतही जागृती निर्माण झाली पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केल. श्रीराम वाचन मंदिर व क्रिडा भवन सावंतवाडी आयोजित स्वातंत्र्यसैनिक जयानंद मठकर व्याख्यानमालेत भारतीय स्त्रीया, प्रश्न आणि प्रश्न या विषयाची मांडणी याविषयी स्त्रीरोग तज्ञ व साहित्यिक डॉ ऐश्वर्या रेवडकर बोलत होत्या. याप्रसंगी अध्यक्षस्थानी डॉ विजयालक्ष्मी चिंडक, मृणालिनी कशाळीकर, डॉ सुमेधा नाईक धुरी, वाचन मंदिर अध्यक्ष प्रसाद पावसकर, कार्यवाह रमेश बोंद्रे, कार्याध्यक्ष अँड संदीप निंबाळकर, साहित्यिक प्रा. प्रविण बांदेकर, डॉ. जी ए बुवा आदी उपस्थित होते.