
सावंतवाडी : महाराष्ट्र चेंबर्स आॅफ काॅमर्स इंडस्ट्रीज अॅन्ड अॅग्रिकल्चरच्या माध्यमातून कोकणातील विविध समस्यांबाबत पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन मसिआचे कोकण विभागिय उपाध्यक्ष श्रीकृष्ण परब यांनी केले. राज्यस्तरीय चर्चासत्रात संबोधित करताना ते बोलत होते.
महाराष्ट्र चेंबर्स आॅफ काॅमर्स इंडस्ट्रीज अॅन्ड अॅग्रिकल्चरच्या माध्यमातून कोकणातील विविध समस्यांबाबत नाशिक येथे संपन्न झालेल्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली . कोकण रेल्वेच्या अनेक समस्या असून ज्या भूमिपुत्रांनी कवडीमोल दराने आपल्या जमीनी दिल्या आणि हा दूरदर्शी प्रकल्प मार्गी लागला त्या भूमीपुत्रांचाआजही प्रवास सुखकर होत नाही. अनेक सुरू झालेल्या गाड्यांना दक्षिणेकडील राज्यात थांबे मिळतात मात्र कोकणातील प्रवासी वंचित रहातात. कुडाळ एम्. आय्. डि सी. चा विद्युत पुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला असून जुन्या उद्योजकांना कमी दाबाने विद्युत पुरवठा होत असून नव उद्योजकांना विद्युत जोडणी मिळत नसल्याने आपला उद्योग सुरू करता येत नाही. दरवर्षी वादळी पावसामुळे विद्युत वाहिन्या व पोल कोसळतात त्यामुळे विद्युत पुरवठा बंद होतो. सिंधुदुर्ग जिल्हा हा भारत सरकारने १९९७ रोजी पहिला पर्यटन जिल्हा जाहीर केला. मात्र मुलभूत सुविधांचा अभाव असल्याने पर्यटन व्यवसायिंकांना आर्थिक समस्याना तोंड द्यावे लागते. निवती येथील आ़ग्रियां बेटासारखी दुर्मिळ पर्यटन स्थळे विकसित केल्यास पर्यटन व्यवसायाला चालना मिळून बेरोजगार तरुणांना रोजगार मिळू शकतो. अशा विविध सुचना या बैठकीत करण्यात आल्या.
या सर्व प्रश्नांबाबत जे प्रश्न केंद्राच्या अखत्यारीत असतील ते केंद्रीय स्तरावर व राज्यस्तरीय समस्या राज्यस्तरावर संबधित मंञ्यांना भेटून मांडण्यासाठी मसिआ कटिबद्ध असून लवकरच याबाबत संबंधित विभागा बरोबर बैठकीच आयोजन करण्याची ग्वाही मविआचे अध्यक्ष ललीत गांधी यांनी दिली. मविआचे कोकण विभागीय उपाध्यक्ष श्रीकृष्ण परब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या चर्चासत्रात गव्हर्निंग कौन्सिलचे सिंधुदुर्गचे सदस्य, राजन नाईक, संतोष राणे, मिलिंद प्रभू, मनोज वालावलकर, शिवाजी घोगळे व मिडिया, पब्लिक रिलेशन, कम्युनिकेशन समितीचे उपाध्यक्ष अॅड नकुल पार्सेकर यांनी सहभाग घेतला.