विनायक राऊतांनी ११ वर्षात काय केले..? : नारायण राणे यांचा सवाल

Edited by: उमेश बुचडे
Published on: April 11, 2024 13:31 PM
views 335  views

कणकवली : लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात शिवसेना उबाठा पक्षाचा एकही खासदार निवडून येणार नाही. विरोधकांकडे नेतृत्व शिल्लक राहिले नाही. भाजपाचे ३७० आणि एनडीए चे मिळून ४०० पार खासदार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नारा आहे. मोदी जे बोलतात ते करून दाखवतात. २०१४ साली जागतिक अर्थव्यवस्थेत १४ व्या क्रमांकावर असलेला भारत मोदी यांनी जगात ५ व्या क्रमांकावर आणला आहे. येत्या काळात भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था मोदी करणार आहेत. महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी मोदी सरकारने विशेष उपक्रम राबवले. मोदींनी ८० कोटी जनतेला मोफत धान्य सुरू ठेवले आहे. खासदार म्हणून विनायक राऊत यांनी मागील १० वर्षांत काय केले ? असा सवाल केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी केला. 

कणकवली येथील नगरपंचायत क्षेत्रातील भाजपा पदाधिकारी व  महायुती कार्यकर्ते संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार नितेश राणे, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी नगरसेविका राजश्री धुमाळे, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, अनुसूचित जाती सेल जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव, शहराध्यक्ष अण्णा कोदे आदी उपस्थित होते.  ना. नारायण राणे म्हणाले , कोकणात रोजगार आणि व्यावसायिक शिक्षण यावरच माझा भर आहे. रोजगार मिळावा म्हणून दोडामार्ग मध्ये १ हजार एकरवर ५०० कारखाने आणण्याचा माझा मानस आहे. शुभकार्याला जाताना जसे देवाच्या पाया पडतो तसाच आता लोकसभेला सामोरे जायचंय तर आधी कणकवली शहराला सामोरा जातोय अशी भावनिक साद केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी कणकवली शहर महायुती कार्यकर्ता संवाद मेळाव्यात घातली. तसेच कणकवली शहरातील ९० टक्के मतदान महायुती ला हवे आहे. कणकवली हे जिल्ह्याचे मध्यवर्ती केंद्र आणि व्यापाराचे केंद्र आहे. विनायक राऊत भाजपाच्या जीवावर खासदार झाले. स्व. बाळासाहेबांनी कायम काँग्रेस ला विरोध केला. आज उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि शरद पवारांसोबत घरोबा केला. अशी टिका त्यांनी केली. 

विकासकामांत अपयशी ठरलेल्या विनायक राऊत यांना घरी बसवण्याची वेळ आता आली आहे. विनायक राऊत स्वतःच्या तळगाव गावातील घराकडे जाणारा रस्ता माझ्या विकास निधीतून केला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षांत कोकणासाठी काय दिले? रोजगार, आरोग्य दळणवळण सिंचन साठी काय केले ? कोकणी माणसामुळे शिवसेना फोफावली. पण त्याच कोकणी माणसाकडे शिवसेनेने दुर्लक्ष केले. दोडामार्ग मध्ये १ हजार एकरवर ५०० कारखाने आणणार आहे. ओरोस येथे टेक्निकल सेंटर सुरू केले आहे. फ्रुट प्रोसेसिंग मशीन आणि इंजिनिअरिंग चे प्रशिक्षण तेथे देण्यात येणार आहे. ट्रेनिंग घेतलेल्या मुलांना देशात परदेशात नोकरी मिळेल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी झटून कामाला लागा. मागील ५ वर्षांत कणकवली शहराचा केलेला विकास जनतेसमोर आहे. स्वाभिमान पक्षाच्या माध्यमातून कणकवली नगरपंचायत ची सत्ता २०१८ साली ताब्यात आली. आता भाजपाच्या झेंड्याखाली आपण सर्व एकवटलेले असल्याने आपली ताकद दुप्पट झाली आहे. २०१८ साली ७० टक्के मतदान आपल्याला झाले होते. यावेळी ८० टक्के मतदान कणकवली शहरातून महायुतीला व्हायला हवे. ठाकरे सरकारने कणकवली नगरपंचायतच्या विकासकामांत नेहमी खोडा घातला. पाठवलेल्या विकासकामांच्या प्रस्तावाला केराची टोपली कायम दाखवली. याचा जाब विनायक राऊत याना शहरवासीयांनी विचारला पाहिजे. एकीकडे भाजपा नेत्यांवर टीका करायची आणि दुसरीकडे डोंबिवलीत जाऊन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे जाऊन भाजपात येण्यासाठी नाहीतर माझ्या नशिबात लाल दिवा नव्हता, मला जवळ घ्या असा संदेश विरोधक देत असल्याची टीका नाव न घेता आमदार नितेश राणे यांनी केली. 

राज्यात महायुती चे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सढळ हस्ते विकासनिधी दिला. कणकवली शहर हा आमचा बालेकिल्ला आहे. कणकवली म्हणजे राणे साहेब हे वर्षानुवर्षे समीकरण आहे. कणकवली शहरात नवीन डीपी रोडचे जाळे विणले असून शहरातील वाहतूक कोंडी ची समस्या सुटली आहे. प्रास्ताविक राजश्री धुमाळे यांनी सूत्रसंचालन किशोर राणे यांनी केले.