वेंगुर्ले : नगरपरिषद ही स्वच्छतेकडून समृद्धीकडे वाटचाल करत आहे.स्वच्छ भारत पर्यटन स्थळ’ अर्थातच कंपोष्ट डेपो येथे राबविलेला शेती हा उपक्रम सर्व पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे, असे मत मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी व्यक्त केले.
या ठिकाणी लाल भाजी, मका, भेंडी इ. भाजीपाला तसेच सुर्यफुल व झेंडू यासारखी फुलझाडे तसेच विविध प्रकारची फळझाडे जसे की जाम, पेरू, पपई, चिकू लावून ज्या ठिकाणी अगोदर कचऱ्याचे ढीग साचले असायचे त्याच ठिकाणी आता फुला- फळांची बाग बहरली आहे. या ठिकाणी नगरपरिषदेमार्फत ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून निर्मित जैविक खत व प्रक्रिया केंद्रातील पाण्याचा वापर सिंचन व झाडांच्या वाढीसाठी करण्यात येत आहे .येथे काम करणारे नगरपरिषदेचे स्वच्छता कर्मचारी या झाडांच्या जतन व संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करत आहेत.