वैभववाडी : शहराला पाणी पुरवठा करणा-या स्त्रोतांची पाणी पातळी खालावली आहे.त्यामुळे शहरवासीयांना एक दिवस आड पाणी पुरवठा करण्यात येत आहे.नागरिकांनी पुढील काही दिवस पाणी जपून वापरावे असे आवाहन नागरिकांना मुख्याधिकारी सुरज कांबळे केले आहे.
त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे शहरातील नागरिकांना आवाहन करताना म्हटले आहे की, वातावरणात झालेल्या बदलामुळे गेल्या काही दिवसांपासून तापमान वाढले आहे. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या विहीरींच्या पाणी पातळीत घट झाली आहे.यामुळे शहरात नियमितपणे पाणीपुरवठा करताना समस्या भेडसावत आहेत.
विहीरीतील पाण्याच्या उपलब्धतेनुसार एक दिवस आड पाणीपुरवठा केला जात आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर पाण्याची पातळीत वाढ होईल त्यानंतर नियमित पाणीपुरवठा केला जाईल. नागरिकांनी पुढील काही दिवस पाण्याचा काटकसरीने वापर करावा असं आवाहन श्री. कांबळे यांनी केले आहे.