कणकवली : केंद्र व राज्य सरकारने विम्याचा हप्ता न भरल्याने शेतकऱ्यांची आंबा काजू पीक विम्याची रक्कम प्रलंबित होती. आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी मोर्चा, आंदोलनाच्या माध्यमातून दिलेल्या लढ्यामुळे पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे.
त्याबद्दल मालवण तालुकयातील शेतकऱ्यांनी रविवारी आ. वैभव नाईक, सतीश सावंत, संदेश पारकर यांची भेट घेऊन त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व आभार मानले. यावेळी शेतकरी मनोज राऊत म्हणाले, केंद्र व राज्य सरकारमुळे प्रलंबित असलेली फळ पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी आमदार वैभव नाईक,सतीश सावंत, संदेश पारकर यांनी मोर्चा व आंदोलन केल्यामुळे आणि कृषी विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा दिल्यामुळे तातडीने यावर कार्यवाही होऊन शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा झाली आहे. जिल्ह्यात आणखी दोन आमदार आहेत मात्र त्यांनी शेतकऱ्यांच्या रखडलेल्या विम्याच्या रक्कमेबाबत एकही शब्द काढला नाही. मात्र आ. वैभव नाईक हे शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, बांधकाम कामगारांसाठी, मच्छिमारांसाठी झटत आहेत.आम्हा शेतकऱ्यांचा त्यांना पाठींबा आहे.असे निरोम येथील शेतकरी मनोज राऊत यांनी सांगत आभार मानले.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, मालवण तालुकयातील शेतकरी सुभाष मांजरेकर, विनायक राऊत,सुभाष राऊत आदी उपस्थित होते.