शेवटपर्यंत संघर्ष करणार : वैभव नाईक

Edited by:
Published on: December 03, 2024 20:02 PM
views 224  views

कुडाळ : विधानसभा निवडणुकीत शिवसैनिकांनी अपार कष्ट केले. सत्ताधाऱ्यांना कडवी झुंज दिली. म्हणून आपल्याला ७३००० मतांपर्यंत मजल मारता आली. मी सामान्य माणसांचा लोकप्रतिनिधी होतो. आणि सर्व सामान्य नागरिक,कार्यकर्ते माझ्या पाठीशी राहिले. त्यामुळे पुढील काळात आपल्याला जेवढं काम करता येईल तेवढ काम मी करणार आहे. शेवटचा माणूस जोपर्यंत माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवतोय तोपर्यंत मला काम करायचे आहे. पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी हि बैठक आयोजित केली आहे. सत्ताधारी  आणि अधिकारी यांच्याकडून जेव्हा जेव्हा चुकीचं घडेल तेव्हा विरोधक म्हणून आपल्याला तीव्र विरोध केला पाहिजे. लोकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे. भावना सर्वांच्याच असतात पण भावना बाजूला ठेवून काम करावे लागणार आहे. निवडणुकीत मला नुसता विजय मिळवायचा असता तर  भरतशेठ गोगावले यांचा दसऱ्याच्या दिवशी मला फोन आला होता ते म्हणाले तुम्ही अजूनही आमच्यातून निवडणूक लढवा. मग समोरच्या उमेदवाराचा प्रवेश ते घेणार नव्हते. परंतु मला निष्ठेने राहून विजय मिळवायचा होता. ज्याप्रमाणे मी निष्ठावंत राहिलो त्याप्रमाणे आपण सर्व शिवसैनिक निष्ठावंत राहिलात. तुमचा विश्वासघात मी करणार नाही. लोक म्हणतात आता मी कोणता निर्णय घेणार मात्र तेव्हा स्वार्थासाठी होता तो निर्णय मी घेतला नाही तर आता कशाला घेईन. माझ्या विरोधात निवडून आलेल्या उमेदवाराला मी तेव्हाच शुभेच्छा दिल्या. आता  दिल्लीपासून गल्लीपर्यंत त्यांचीच सत्ता आहे. त्यांनी विकास कामे करून दाखवावीत. हे करत असताना सत्ताधारी आणि अधिकारी यांनी एक लक्षात ठेवावे चुकीच्या पद्धतीने सत्तेचा दुरुपयोग करून कामे केल्यास आणि आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिल्यास ते आम्ही खपवून घेणार नाही. हजारो कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत प्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करू.माझ्या राजकीय जीवनाची सुरुवातच संघर्षातून झाली आहे.संघर्ष आम्हाला नवीन नाही, शिवसैनिकांच्या साथीने शेवट्पर्यंत संघर्ष करीत राहणार आहे अशी ठाम भूमिका माजी आमदार वैभव नाईक यांनी मांडली. 

 मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची  बैठक आज  कुंभारमाठ येथील जानकी हॉल येथे संपन्न झाली. कुडाळ प्रमाणेच मालवण तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बैठकीला लाभला होता. वैभव नाईक यांच्या पाठीशी खंबीरपणे राहण्याचा निश्चय यावेळी मालवण शिवसेनेने घेतला. 


       यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते , मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी, नितीन वाळके, यतीन खोत, बाबी जोगी, मंदार गावडे, मंदार ओरसकर, संमेश परब, पूनम चव्हाण, दीपा शिंदे, श्वेता सावंत, सेजल परब, देवयानी मसुरकर, मीनाक्षी शिंदे , बाबा सावंत, उमेश मांजरेकर, किरण वाळके, नंदू गवंडी, बाळ महभोज,उदय दुखंडे, भाऊ चव्हाण,अमोल वस्त,पंकज वर्दम, नंदू गावडे, मंगेश टेमकर, पराग नार्वेकर, विनायक परब, गणेश कुडाळकर, रश्मी परुळेकर,अमित भोगले, राजेश गावकर, समीर लब्दे, विजय पालव, भगवान लुडबे, बंडू चव्हाण,अनिल गावकर, श्रीकांत बागवे, महेंद्र म्हाडगुत, मनोज मोंडकर, तपस्वी मयेकर, अक्षय रेवंडकर, पीयूष चव्हाण, रूपा कुडाळकर, भाऊ चव्हाण, आर्या गावकर,रीमा पारकर,प्रियांका रेवंडकर, स्वप्नील पुजारे, अरुण लाड, अनुष्का गावकर, निना मुंबरकर, तेजस लुडबे यांसह विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, बुथप्रमुख, सरपंच, उपसरपंच, ग्रा. प. सदस्य महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी,शिवसेना सेलचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सर्व आजी, माजी लोकप्रतिनिधी व  शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.