
कणकवली : शहरात वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात खोळंबा झाल्याची घटना समोवारी सायंकाळी बस स्टँड समोर घडली आहे. कोल्हापूर येथील एका वाहन चालकाने सर्विस रोडवर आपले वाहन पार्क करून बाजार खरेदी करण्यासाठी गेला होता. यावेळी बस स्थानकातून आलेली बस ही बाहेर जाण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली मुख्य रस्त्यांवर वाहनांची लांबच लांब रांग लागल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, वाहतूक कोंडी वाढत असतानाच पोलीस प्रशासनाला वारंवार फोन करून माहिती देण्यात आली. मात्र, पोलीस वेळेत घटनास्थळी न पोहोचल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी तात्काळ उपाययोजना न झाल्यामुळे काही काळ परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचेही नागरिकांनी सांगितले. नागरिकांनी स्वतः कार उचलून रस्त्याच्या बाजूला ठेवली आणि वाहतूक सुरळीत केली. पोलीस उशिरा दाखल होत त्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. दरम्यान भविष्यात अशा प्रकारच्या घटनांवर त्वरित प्रतिसाद देण्यासाठी पोलीस प्रशासनाने अधिक सतर्क राहावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.










