कुडाळ : जिल्हा परिषदने भजनी मंडळांना अजून भजन साहित्य पोचविले नाही. जर येत्या दोन दिवसांत भजन साहित्य पोच न झाल्यास जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर भजन करू असा इशारा कुडाळ युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी दिला आहे.
याआधी जिल्हा परिषदच्या नावावर अनेक विक्रम आहेत. वॉटर प्युरीपायरचा घोटाळा, शिक्षण विभागातील खुल्या प्रवर्गाच्या आरक्षणात घोळ करून आपली वेगळी ओळख जिल्हा परिषदने निर्माण केली. जिल्हा परिषदने गणेश चतुर्थी संपत आली तरी भजनी मंडळाना साहित्य दिलं नाही. जिल्हा परिषदच्या या गलथाणपणाला जबाबदार कोण? असा सवाल योगेश धुरी यांनी उपस्थित केला आहे.जिल्ह्याचे पालकमंत्री सुशागात आहेत. त्यांना याच्याशी काहीही देणंघेणं नाही. निदान म्हाळाच्या भजनापर्यन्त तरी भजन साहित्य पोचेल का? अशी चर्चा भजन मंडळात आहे, असा उपरोधिक टोला लगावला आहे. अजूनपर्यंत भजन साहित्य मंडळांना पोच झालं नाही. हे सरकारच गद्दारीतून बनलेले आहे. मग बाकीच्याकडून अपेक्षा काय म्हणून ठेवायच्या? येत्या 2 दिवसात भजन साहित्य पोच झालं नाही तर पेटी तबला घेऊन जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात भजन करून देवाला विनंती करू की ह्यांना बरी बुद्धी द्या आणि गद्दारांचं सरकार जाऊ देत, असा टोला लगावत योगेश धुरी यांनी इशारा दिला आहे.