...तर परजिल्ह्यातील उमेदवारांना जिल्ह्यातील शाळेत रूजू होऊ देणार नाही

स्थानिक डी.एड बेरोजगारांनाच भरती करून घ्या : अमित सामंत
Edited by: विनायक गावस
Published on: September 01, 2023 20:31 PM
views 74  views

सिंधुदुर्ग : पवित्र पोर्टल मधून स्थानिकांना झुगारून जे पर जिल्ह्यातील उमेदवार जिल्ह्यात शिक्षक म्हणून येतील त्यांना जिल्ह्यातील शाळेत रुजू होऊ देणार नाही. वेळ पडल्यास हाकलून लावू. पण, यावेळी स्थानिकांना शिक्षक भरतीमद्ये न्याय दिल्याशिवाय राहणार नाही  असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा हा डोंगराळ भागात वसलेला असून शैक्षणिक गुणवत्तेचे प्रमाण हे अतिशय चांगले आहे. दहावी बारावीमध्ये कोकण नेहमीं अव्वल अशा बातम्या बऱ्याच वर्तमान पत्रात झळकतात पण हीच कोकणची मुले नोकऱ्यांत कूठे जातात ? त्यांच्याकडे गुणवत्ता नाही का ? की मुद्दाम भरतीत कोकणला डावलले जाते ? की सिंधुुदुर्ग नोकरीचा कारखाना बनलेला आहे. हा पडलेला प्रश्न आहे. रोजगाराची संधी उद्योग, व्यवसाय हे ईथे अल्प प्रमाणात उपलब्ध आहेत बहुसंख्य हजारो उच्चशिक्षित डी.एड धारक तरुण-तरुणी गेलीं दहा वर्ष भरती झालीच नसल्याने बेरोजगार म्हणुन पडुन आहेत.जर आज भरतीत संधी नाही मिळाली तर त्यांचे आयुष्य देशोधडीला लागल्यात जमा आहे. सद्यस्थितीत पोर्टल सूरू होऊन TET परीक्षा पास असणारे राज्यातील सर्वच उमेदवार रजिस्ट्रेशन करणार आहेत.भरती बरीच वर्ष नसल्याने लोंढा मोठा आहे.भरती राज्यस्तरीय असल्याने स्पर्धाही वाढलेली आहे. फेब्रुवारी मधे IBPS कंपनी द्वारे घेतलेल्या TAIT परीक्षेच्या मेरीटवरच पोर्टलच्या माध्यमातून ही भरती केली जाणार आहे. त्यामुळं या भरतीत सहाजिकच स्थानिकांना न्याय मिळणार नाही हे येणार चित्र आहे.

सद्यस्थितीत सिंधुदुर्गात  शिक्षकांची एकूण १११८ रिक्त पदे आहेत.पूर्ण कोकणचा विचार केला तर फक्त कोकणातच ५००० शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत.त्यामूळे पवित्र पोर्टल नुसार TAIT म्हणजेच अभियोग्यता मेरिट वर भरती झाली तर आपल्या जिल्ह्यातील १०% पण उमेदवार लागणार नाही ही चिंतेची बाब आहे.हे पाहता पवित्र पोर्टल हे सिंधुदुर्ग डी.एड बेरोजगारांवर अन्यायकारक ठरणार आहे. फेब्रुवारी मधे IBPS ने हल्लीच घेतलेली परीक्षेतील प्रश्न बँकींग क्षेत्राशी निगडित होते.शिक्षकी पेशाचां आणि अभ्यासक्रमाचा काडीमात्र संबंध नव्हता.त्यामुळे बऱ्याच उमेदवारांना ही परीक्षा क्लिष्ट,कठीण गेलेली आहे. अचानक परीक्षा लावल्यामुळे उमेदवारांना नीट अभ्यास देखिल करता आला नाही.त्यामुळे आज जिल्ह्यातील उमेदवार या भरती मधून कायम मुकण्याची शक्यता आहे.

परजिल्ह्यातील उमेदवार तीन वर्ष नोकरीसाठी सिंधुदुर्ग मध्ये येतात आणि परत बदली करून आपल्या जिल्हयात जातात त्यामुळे शाळा पुन्हा शिक्षकाविना रिक्त राहतात. गेले पाच महिने सिंधुदुर्ग जिल्ह्याने हे अनुभवले आहे.अचानक बदली आदेश निघाल्याने अनेक शाळा शून्य शिक्षकी राहिल्या असल्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.आणि आताची तशीच परिस्थीती निर्माण झाल्यामुळे  हे चित्र कधीं थांबेल सांगता येत नाही.निवृत्त शिक्षकांना घेण्याचा शासन निर्णय आला पण ५० च्या घरातच निवृत्त शिक्षक रुजू झाले त्यामुळे हे सगळ फोल ठरले.स्थानिकांना माञ एवढी आंदोलने करुन देखिल डावलले आहे.जर आता भरती प्रक्रियेतून स्थानिक डी.एड धारकांना नियुक्त्या मिळाल्या तर वारंवार होणारी आंदोलने आणि स्थानिक भूमिपुत्र यांच्यावर होणारा अन्याय थांबेल.


सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दुर्गम डोंगराळ भागाचे निकष, बोलीभाषेचे निकष ओळखून भरती केल्यास विद्यार्थी स्थानिक बोलीभाषा आणि प्रमाण भाषेची असलेली जोड लक्षात घेता  प्रत्येक जिल्हास्तरावर तिथले स्थानिक डी.एड उमेदवार शिक्षक म्हणुन नियुक्त केले तर बोलीभाषेचा प्रश्न मिटून जाईल आणि अध्ययन अध्यापन प्रक्रिया चांगल्या प्रकारे होऊन मुलांची गुणवत्ता नक्किच गुणवत्ता वाढेल.

१९९९ मद्ये कोकण निवड मंडळ असल्याने जिल्ह्यातील बेरोजगाराना जिल्ह्यातच नोकरीला संधी मिळत होती. स्थानिकांना न्याय द्यायचा असेल तर पूर्वी प्रमाणे १९९९ मद्ये बरखास्त झालेले कोकण निवड मंडळ सूरु करण्याचा शासन निर्णय निर्गमित व्हावा. शिक्षणमंत्री हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे असुन स्थानिकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते.पण तसे दिसत नाही.ते दिवसागणिक नवीन घोषणा करत आहेत.त्यामुळे त्यांनी स्वतःच्या मतदारसंघातील स्थानिकांना न्याय देण्याचे भाग्याचे काम करावे असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी लगावला आहे.