सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेत झाली पाहिजेत - महसूल मंत्री बावनकुळे

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: August 13, 2025 19:33 PM
views 115  views

सिंधुदुर्गनगरी : राज्य शासन विविध लोककल्याणकारी, लोकाभिमूख योजना राबवून गतिमान आणि पारदर्शक पद्धतीने काम करीत आहे. तळागाळातील पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे महसूल यंत्रणांनी सर्वसामान्य नागरिकांना महसूल विभागाच्या सर्व सेवांचा लाभ वेळेत मिळावा यासाठी काम करावे, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बानकुळे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महसूल, मुद्रांक शुल्क व नोंदणी विभाग, भुमि अभिलेख विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर,  अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे, उपजिल्हाधिकारी आरती देसाई, शारदा पोवार, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाचे सह जिल्हानिबंधक व मुद्रांक अधिकारी, भुमि अभिलेख विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीस महसूल मंत्री यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात नागरिकांचे निवेदन स्विकारुन त्यांच्याशी संवाद साधला.

महसूल मंत्री श्री. बावनकुळे यावेळी म्हणाले की, गणेशोत्सव काळात प्रत्येक गावात 'ॲग्रीस्टॅक अंतर्गत नोंदणी करण्यासाठी विशेष शिबीरांचे आयोजन करून उर्वरित नोंदणी पुर्ण् करा. जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांनी आठवड्यातून दोन गांव खेड्यात जाऊन नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घ्याव्यात आणि त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. महसूल अधिकाऱ्यांकडील अर्धन्यायिक प्रकरणांचा जलद व कायमस्वरूपी निपटारा करण्यासाठी लोक अदालतींचे आयोजन करा.  महसूल विभागाचा सर्व नागरिकांशी संबंधीत असून, जनतेच्या जिवाचे व मालमत्तेचे संरक्षण करण्याचे काम महसूल करण्यात येते. प्रत्येक नागरिकांचा महसूल विभागाशी संबंध येत असल्याने महसूल विभागाकडून सर्वसामान्यांना नागरिकांच्या खुप अपेक्षा असतात. त्यानुसार आपणांस आपली कार्यक्षमता वाढवून महसूल विभागाच्या सर्व सेवा नागरिकांना वेळेत देण्याचे नियोजन करुन काम करावे . नाविन्यपूर्ण योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात केलेल्या कामासंदर्भातील माहिती समाजमाध्यमांद्वारे जनतेपर्यंत पोहचवावीत यामुळे विभागाबद्दल जनतेमध्ये सकारात्मकता निर्माण होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रारंभी, जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांचे स्वागत केले. जिल्ह्यात महसूल, भूमी अभिलेख, नोंदणी व मुद्रांक शुल्क आदी विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध योजना आणि सेवांचा संबंधीतांना सादरीकरणांद्वारे सविस्तर आढावा सादर केला. महसूल विभागामार्फत विविध योजना राबवित असतांना येणाऱ्या अडचणी, तसेच शासनस्तरावर प्रलंबित असलेल्या प्रकरणांबाबतची माहिती महसूल मंत्र्यांनी सादर करण्याच्या सूचना केल्या.