सावंतवाडी : फुलपाखरु महोत्सवामुळे पारपोली गावानं जगभरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे असे महोत्सव एका हंगामा पुरते मर्यादित न राहता हे नावीन्यपूर्ण महोत्सव सातत्याने होणे गरजेचे आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पर्यटनात्मक विकासासाठी सिंधुरत्न योजना राबविल्याने जिल्ह्यात रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. पारपोली गावाला जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ८० लाखाचा निधी दिला आहे. अपघातान पालकमंत्री झालो असलो तरी जिल्ह्याचा सुपुत्र आहे. जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी भरीव निधी देण्यात येईल असं मत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. पारपोली येथील फुलपाखरू महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
पारपोली येथे संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फुलपाखरु महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. दीपप्रज्वलन व वृक्ष पुजनान या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी महोत्सवाच्या लोगोचे अनावरण व माहिती पुस्तिकेचे देखील प्रकाशन करण्यात आले. तर सरपंच कृष्णा नाईक, मानद वन्यजीव संरक्षक काका भिसे, फुलपाखरू तज्ञ हेमंत ओगले, अमित भिलारे यांसह मान्यवरांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
रविंद्र चव्हाण म्हणाले,
दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतील फुलपाखरांचे पर्यटन कायमस्वरुपी सुरु राहण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. सिंधुरत्न योजना राबविल्याने जिल्ह्यात रोजगाराच्या संधी निर्माण होत असून जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी भरीव निधी देण्याचे आश्वासनं पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले.
तर मंत्री दीपक केसरकर म्हणाले, हा महोत्सव नियमित व्हावा जेणेकरून इथे पर्यटक सातत्याने येतील आणि पर्यटन वाढेल. जिल्ह्यातील उभादांडा हे गाव कवितांचे गाव म्हणून ओळखले जाणार आहे. पारपोली गावाने आता जगात फुलपाखरांचे गाव म्हणून ओळखले निर्माण केली आहे. न्याहरी निवास योजना राबवून सर्वांनी आपल्या गावांचा विकास करावा. गावकऱ्यांनी एकत्र येऊन विविध योजनांचा लाभ घ्यावा. जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळे एकमेकांना जोडून टुरिस्ट सर्किट बनवावे असेही ते म्हणाले.
तर आपला जिल्हा जैवविविधतेने नटलेला जिल्हा आहे. जिल्ह्यात पर्यटक आल्यानंतर गावकऱ्यांनी न्याहरी योजनेच्या माध्यमातून पर्यटकांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात जेणेकरून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असं मत जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी व्यक्त केले. तर उपवनसंरक्षक रेड्डी म्हणाले, पारपोली गावात जैवविविधता असल्याने या गावात १८० पेक्षा जास्त फुलपाखरु प्रजाती आढळतात. २०१५ साली या गावाला 'फुलपाखरांचे गाव' म्हणून सन्मान मिळाला आहे. पर्यटन वाढावे आणि स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी असे महोत्सव सातत्याने होणे आवश्यक आहे. फुलपाखरु महोत्सवामुळे पारपोली गावाला जागतिक ओळख मिळणार आहे. असे महोत्सव जास्तीत जास्त दिवस सुरू ठेवण्याचे आमचे प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी पालकमंत्री रविंद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी किशोर तावडे, उपवनसंरक्षक एस नवकिशोर रेड्डी, माजी आमदार राजन तेली, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाध्यक्ष अशोक दळवी, सहाय्यक उपवनसंरक्षक डॉ. सुनिल लाड, आंबोली वनक्षेत्रपाल विद्या घोडगे, सावंतवाडी वनपरिक्षेत्रपान मदन क्षीरसागर जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, सरपंच कृष्णा नाईक, उपसरपंच संदेश गुरव, तहसिलदार श्रीधर पाटील, आर्किटेक अमित कामत, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रशांत चव्हाण, फुलपाखरू तज्ञ हेमंत ओगले, काका भिसे, अमित भिलारे आदी उपस्थित होते.