
दोडामार्ग : तळकट परिसरातील फळबागायतीत मागील काही दिवसांपासून जंगली हत्तींकडून नुकसानीचं सत्र सुरूच आहे. हत्तींच्या कळपाने येथील शेतकऱ्यांच्या केळी, नारळ, सुपारीच्या बागांना लक्ष्य करून उच्छाद मांडला आहे. यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, वनविभाग मात्र हतबल झाला आहे. हत्तींना रोखण्यास ते असमर्थ ठरले असून शेतकरी मात्र वनविभागावर संताप व्यक्त करत आहेत.
तिलारी खोऱ्यात हत्तींच्या दोन कळपांचा वावर होता. मागील काही दिवसांपासून हे हत्ती या भागात ठाण मांडून आहेत. मध्यंतरीच्या तीन-चार दिवसात या हत्तींचे लोकेशन वनविभागाला मिळत नव्हते. मात्र रविवारी रात्रीपासून हत्ती पुन्हा तळकट परिसरात दाखल झाले आहेत. हे हत्ती दिवस-रात्र येथील शेतकऱ्यांच्या बागायती पायदळी तुडवून त्यांची नासधूस करत आहे. काही ठिकाणी संपूर्ण बाग नष्ट झाली असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी हत्ती फळ बागायतीत घुसत असून अतोनात नुकसान करत आहे.
दिपक माळीक ( नारळ १५ ,आंबे ३) , सर्वेश साळगावकर ( नारळ २५, सुपारी १०, केळी ४०, बांबू बेट ४, सागवान १), विठ्ठल साळगावकर ( नारळ २, सुपारी १०, केळी ५० ), काका राणे ( नारळ ३ ), बाळा महादेव राणे ( केळी ५० ), बाळा देमा देसाई ( नारळ ३, केळी २५) आदींचे नुकसान केले आहे.