गेळेवासीय करणार रवींद्र चव्हाण यांचा सत्कार

Edited by: विनायक गांवस
Published on: August 19, 2025 19:25 PM
views 80  views

सावंतवाडी : महाराष्ट्र शासनाची गेळे गावातील २७८ हेक्टर जमीन १६८ कुटुंबांना वाटप करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश १५ ऑगस्ट रोजी प्राप्त झाला आहे. यामुळे अनेक वर्षांपासून जमिनीच्या हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या गावकऱ्यांची समस्या मार्गी लागली असून, लवकरच त्यांना जमिनीचे हक्काचे सातबारा उतारे मिळणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हे शक्य झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. त्यांच्या या योगदानाबद्दल गेळे गावाच्या वतीने लवकरच त्यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.

गेळे येथील ग्रामस्थ आनंद गावडे, मनोहर गावडे, नितीन गावस, अंकुश गवस, गोपाळ परब, विजय गवस, नारायण लाड, आणि राजाराम बंड यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकातून ही माहिती देण्यात आली. या पत्रकात त्यांनी नमूद केले आहे की, रवींद्र चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे गेळे गावातील २५६ पैकी १६८ कुटुंबांना शासनाच्या २७८ हेक्टर जमिनीचे वाटप आदेश प्राप्त झाले आहेत. या आदेशातून जमिनीवरील आरक्षण वगळण्यात आले आहे.

या वाटपामुळे गेळे गावातील अनेक कुटुंबांना त्यांच्या जमिनीचे मालकी हक्क प्राप्त होणार आहेत, ज्यामुळे त्यांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेचा अंत झाला आहे. या यशामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

याव्यतिरिक्त, महाराष्ट्र शासनाच्या 'खाजगी वने' असा शेरा लागलेल्या ३६४ हेक्टर जमिनीचा प्रश्नसुद्धा चव्हाण यांच्या माध्यमातून लवकरच मार्गी लागेल, अशी आशाही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. गावकऱ्यांसाठी केलेल्या या महत्त्वपूर्ण कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गेळे गावातील नागरिक लवकरच एकत्र येऊन रवींद्र चव्हाण यांचा जाहीर सत्कार करणार आहेत, अशी माहिती गेळे सरपंच सागर ढोकरे यांनी दिली आहे.