सावंतवाडी : गेले चार दिवस मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे आंबोलीतील मुख्य धबधबा काही अंशी प्रवाहित झाला आहे. दरवर्षी सात ते 10 जूनला मोठ्या प्रमाणावर पडत असलेल्या पावसामुळे आंबोलीचा धबधबा अगदी 15 ते 20 जून पर्यंत पूर्ण क्षमतेने प्रवाहित होत असतो. परंतु, यावेळी पावसाने तब्बल 22 जून पर्यंत दडी मारल्यामुळे हा धबधबा पूर्ण कोरडा होता. परंतु, त्यानंतर गेले तीन ते चार दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अंबोली मुख्य धबधबा काही अंशी प्रवाहित झाला आहे.
त्यामुळे आंबोलीच्या धबधब्या प्रवाहित होण्याच्या प्रतीक्षेत असलेले पर्यटक या धबधब्याने मुख्य धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झालेला असेल या आशेने आंबोलीत आले होते. परंतु, त्यांचा काहीअंशी हिरमोड झाला. तरीही मोठ्या प्रमाणावर पर्यटकांनी आंबोलीच्या या धबधब्याखाली जाऊन सेल्फी काढणे तसेच थोडेफार पाणी कोसळत होते त्यावर मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतला. हा पाऊस असाच सुरू राहिल्यास पुढच्या शनिवार रविवार पर्यंत मुख्य धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित होईल अशी अपेक्षा येथील स्थानिकांनी व्यक्त केली असून यंदा श्रावण महिना लवकर असल्याने तत्पूर्वी उरला सुरला वर्षा पर्यटन हंगाम सुरळीत पार पडावा अशी अपेक्षा येथील पर्यटन व्यवसाय त्यांनी व्यक्त केली आहे.