राज्यपालांनी आपल्या वक्तव्यावर माफी मागायला हवी होती

मंत्री दीपक केसरकर यांचं मत
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: December 04, 2022 17:25 PM
views 285  views

कोल्हापूर : ''छत्रपती शिवरायांचा अपमान महाराष्ट्राची भूमी सहन करणार नाही. यापूर्वीही राज्यपालांकडून वक्तव्य आले होते. त्यांनी आपल्या वक्तव्यावर माफी मागायला हवी होती. यावर त्यांचा खुलासा आला असता तर पुढच्या गोष्टी टळल्या असत्या,'' अशी प्रतिक्रिया शिंदे- भाजप सरकारमधील मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. ते कोल्हापूर येथे बोलत होते.


निर्णय केंद्र सरकार घेईल

दीपक केसरकर म्हणाले, राज्यपालाबाबतचे निर्णय केंद्राकडे असतात. राज्यशासनाने त्यांची भूमिका केंद्राला कळवली आहे. कर्नाटकातील बोम्मई सरकारची वागणूक योग्य नाही परंतु आपण योग्य वागायला हवे. कारण सीमावाद सामोपचाराने मिटायला हवा.


शिंदेंनी कानडी अत्याचार सहन केले

दीपक केसरकर म्हणाले, महाराष्ट्रातून बाहेरून लोक आले असतील तर त्यांना 10 भाषांत आम्ही शिक्षण देतो. महाराष्ट्राचे सातबारा देवनागरीमध्ये आहे, पण कर्नाटकचे सातबारा कानडीमध्ये असतात ते वाचताही येत नाहीत. सीमाभागात अत्याचार झाले आहेत. तुम्ही गुन्हा केला म्हणून जेलमध्ये होते. एकनाथ शिंदे यांनी सीमाभागात आंदोलन केले होते. त्यांनी चाळीस दिवस तुरुंग भोगला, कर्नाटकचे अत्याचार सहन केले.


सीमाभागातील लोकांच्या पाठीशी

दीपक केसरकर म्हणाले, आम्ही मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यक्रमाला एक लाखांच्या निधी दिला जातो. सीमाभागात दोन लाख रुपयांचा निधी दिला जातो. उद्या कोर्टाचा निर्णय काय येईल हे माहित नाही पण तो शंभर टक्के महाराष्ट्राच्या बाजूने निर्णय येईल. आमचे आठशे गाव आधी द्या मग दहा पंधरा गावाबाबत बघू. सीमाभागातील जनतेचा आम्हाला अभिमान आहे. आमची त्यांनी पूर्ण सहानुभुती आहे पाठिंबा आहे. महाराष्ट्र सरकार सीमाभागातील जनतेच्या पाठीशी आहे.


प्रेमाने जिंकता येते

पैशाने माणसं विकत घेतली जात असते तर उद्योगपती नेते झाले असते. माणसं प्रेमाने जिंकता येतात. तुम्ही आमदारांना कधी भेटला नाहीत त्यांना घराबाहेर उभं केलं, असं म्हणत केसरकरांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. आम्ही जनतेशी वफादार आहोत. तुम्ही आम्हाला काय म्हणता हे महत्वाचे नाही.