गुरं घेऊन गेलेला शेतकरी पुराच्या पाण्याबरोबर गेला वाहून

Edited by: भरत केसरकर
Published on: July 28, 2023 12:36 PM
views 88  views

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील शिवापूर राऊळवाडी येथील  तुकाराम शंकर राऊळ(४८) हा शेतकरी बुधवारी पुराच्या पाण्यात वाहून गेला.त्याचा मृतदेह गुरुवारी सकाळी वाहुन गेलेल्या ठिकाणापासुन दिड किलोमीटर अंतरावर सापडला.त्याच्या पत्नी,दोन मुले, वडील असा परिवार आहे.

 शिवापूर कोटीवाडी येथील तुकाराम राऊळ हे दरदिवशी प्रमाणे सकाळीच आपली गुरे घेऊन शिवापूर गाव्हाळ भागात(कर्ली नदीकाठी)गेले होते. दुपारचा जेवनाचा डबा सोबत नेला असल्याने ते एकदम सायंकाळी गुरांसह घरी परतत होते,मात्र बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत ते घरी परतले नाही.त्यांची गुरे उशिरा घरी परतली. यामुळे त्यांच्या पत्नीने त्यांचा शोध घेतला पण श्री.राऊळ घरी आलेच नाहीत हे समजल्यावर ती कासावीस झाली.स्थानिक ग्रामस्थांना ही माहिती समजतात त्यांनीही तुकाराम राऊळ याचा शिवापूर गाव्हाळ भागात कर्ली नदी किनारी शोध घेतला मात्र उशिरापर्यंत त्याचा थांगपत्ता लागला नाही.पाऊस मोठा असल्यामुळे नदीपात्रानजिक शोध घेणे मुश्किल झाले.अखेर गुरुवारी सकाळी शिवापूर गावातील ग्रामस्थांनी तुकारामचा शोध सुरु केला असता  त्याचा नदीपात्रानजिक रेनकोट सापडून आला, त्यापुढे दीड किलोमीटर अंतरावर बंधाऱ्याला त्यांचा मृतदेह अडकलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांनी आपल्या यंत्रणेला घटनास्थळी पाठविले.पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला यांनीही आपली यंत्रणा घटनास्थळी पाठवली.