दोडामार्ग : स्वातंत्र्यपूर्व काळापेक्षा आताच्या शिक्षणाची परिस्थिती वाईट झाली असून, गोर - गरिबांची मुलं शिक्षण घेऊ नयेत, ते हुशार बनवून शहरात देश विदेशात जाऊन नोकरी चाकरी करू नयेत, ते अडाणी अज्ञानी रहावे आणि आमचे अंधभक्त भरून आपले झेंडे मिरवावेत. आपल्या विजयाच्या घोषणा देत फिरावेत अशी अवस्था आजच्या राज्यकर्त्यांनी करून ठेवल्याचा जोरदार घणाघात चडवत ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख बाबुराव धुरी यांनी या भागाचे आमदार व शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचेवर अप्रत्यक्षरित्या हल्ला चडवत शिक्षण विभागाच्या कारभाराबाबत अनोखी गांधीगिरी केली आहे.
दोडामार्ग तालुक्यात त्यांच्याच पुढाकाराने शिवसेनेने आता पर्यंत साटेली - भेडशी, भेकूर्ली आणि कुंब्रल या तीन प्राथमिक शाळांत उच्च पदवीधर डीएड शैक्षणिक अहर्ता प्राप्त केलेल्या शिक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यांचं एक महिन्याचे मानधनाची जबाबदारी घेत सरकार ची वाट न पाहता गांधीगिरी आंदोलन छेडलं आहे.
याबाबत त्यांनी दिलेल्या सनसनाटी प्रसिध्दी पत्रकार शिक्षण विभाग व राज्यकर्त्यांच्या अनागोंदी कारभाराबाबत तीव्र ताशेरे ओडले आहेत. आज प्रचंड फी भरून श्रीमंतांची मुलं शहरात आणि विदेशात शिक्षण घेत असताना ग्रामीण भागात मात्र गोर गरीब, शेतकरी, आदिवासी, कष्टकरी, शेतमजुरांच्या मुलांच्या शाळा मात्र बंद करण्याचा घाट घातला जात आहे. हे अतिशय भयानक आणि भीतीदायक आहे. त्यामुळे आजच्या राज्यकर्त्यापेक्षा इंग्रजांचे शिक्षण धोरण चांगले होते, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. कारण त्यांनी सर्वांना समान आणि मोफत शिक्षण देण्याचे धोरण आखले होते.
आताचे राज्यकर्ते मात्र गरिबांच्या मुलांच्या पुढचे शिक्षण काढून घेत आहेत आणि ते अतिशय वाईट आहे. दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावातील शाळेत पाणी, वीज, रेंज, शिपाई हे तर नाहीच पण तालुक्यातील 13 शाळेमध्ये ज्ञानदान करणारे शिक्षकच या शासनाने दिले नाहीत. त्यामुळे भेकुर्ली, कुंब्रल, साटेली - भेडशी येथे शिवसेनेच्या वतीने शिक्षण सेवक नियुक्त केले आहेत. अशाच पद्धतीने ज्या ज्या गावात शिक्षणात अडचणी येत आहेत. तेथील पालक आणि ग्रामस्थांच्या पाठीशी आम्ही उभे राहून त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय करणार आहोत अशी माहिती बाबुराव धुरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.