आंधळ दळतय आणि कुत्रं पीठ खातंय | लोकांना भोगाव लागतय | वीज वितरण कंपनीचं काय जातय..?

Edited by: विनायक गावस
Published on: July 06, 2023 14:58 PM
views 234  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यात सध्या वीज वितरण कंपनीचे तीन तेरा वाजले आहेत. माडखोल, ओटवणे, कोलगाव सांगेली, मळगाव बहूतांशी ग्रामीण भागात वीज तारा सातत्याने तुटून अपघाताचे प्रसंग उद्भवत आहेत. पावसाळ्यापुर्वी योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे तसेच मेंटनन्सचीं कामे वेळेत न केल्याने ही भयानक परिस्थिती उद्भवली असून माणसे जनावरे यांना जीव गमवावे लागत आहेत. त्यामुळे येत्या महिना भरात तालुक्यातील ग्रामीण भागातील वीज यंत्रणा सुरळीत न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा आशिष सुभेदार यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन देखील उपअभियता संदीप भुरे यांना देण्यात आले.

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने सावंतवाडी वीज वितरण कार्यालयाचे उपअभियंता श्री संदीप भुरे यांची भेट घेत सावंतवाडी शहरासहित तालुक्यातील वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचे वाभाडे काढले. विजेच्या विविध समस्यावर चर्चा करून निवेदन देण्यात आले. सावंतवाडी तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी वीज यंत्रणा कोलमडली आहे. ग्रामीण भागात गंजलेल्या तारा तुटून पडणे, उघडे ट्रान्सफॉर्मर, मेंन लाईनवर झाडी वाढणे, कमी जास्त दाबाने वीज पुरवठा होणे, ट्रान्सफॉर्मर उडणे, चार चार दिवस वीज पुरवठा खडीत होणे, दिवसातून सातत्याने वीज जाणे अशा समस्या वाढत आहेत. पाहिल्यचं पावसात ओटवणे येथे वीज तार तुटून पडल्यामुळे शाळकरी मुलाचा मृत्यू झाला होता. वीज कंपनीच्या हलगर्जी पणामुळे त्यां मुलाला आपला जीव गमवावा लागला. शिवाय तालुक्यात वीज तारा तुटण्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत. मळगाव येथे आज वीज तार तुटून पडल्याने स्पर्श होऊन गाय मृत्युमुखी पडली तर तेथील शेतकरी थोडक्यात बचावले. अशा भयानक परिस्थितीला लोकांना वीज कंपनीमुळे बळी पडावे लागत आहे. तालुक्यात अपुरा वायरमन स्टाफचीं समस्या कायम आहे. कत्राटी पद्धतीने वायरमन घेऊन ते तातडीने गांवात कार्यन्वित करावे यासाठी हालचाली होणे आवश्यक आहे.ग्रामीण भागात विजेचा पूर्णपणे बट्ट्याबोळ झाला आहे. ठीकठिकाणी वीज तारा तुटण्याच्या घटना घडतं आहेत. ओटवणे येथे  घडलेला प्रकार दुर्दैवी असून कुटुंबियांना तातडीने नुकसान भरपाई दिली जावी वं तालुक्यातील ढासळलेली वीज यंत्रणा सुरळीत केली जावी अन्यथा तीव्र आंदोलन मनसे तर्फे छेडण्यात येईल असा ईशारा देण्यात आला.

यावेळी माजी शहरअध्यक्ष तथा मनविसे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, कार्याध्यक्ष संतोष भैरवकर, माजी विभाग अध्यक्ष मंदार नाईक, शहर उपाध्यक्ष शुभम सावंत सहसचिव मनोज कांबळी मनविसे तालुका उपाध्यक्ष प्रणित तळकर प्रशांत सावंत आदी उपस्थित होते.