LIVE UPDATES

नागवे येथील 'तो' धोकादायक साकव अखेर रहदारीस बंद

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: June 17, 2025 22:58 PM
views 313  views

कणकवली : तालुक्यातील नागवे येथील लोखंडी साकव धोकादायक स्थितीत असतानाही त्यावरून ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू असल्याची चित्र दिसून आले होते. याबाबत ग्रामस्थांनी लक्ष वेधताच जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रशासनाला सूचना देत तात्काळ पाहणी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर तत्परतेने कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे व गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी मंगळवारी सायंकाळी नागवे गाठून साकवाची पाहणी केली. खबरदारीचा उपाय म्हणून सदरचा साकव रहदारीस बंद करण्यात आला आहे.

देशपांडे, चव्हाण यांनी भेट दिली त्यावेळी यावेळी शाखा अभियंता गणेश कडुलकर , गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, सरपंच सिद्धीका जाधव, उपसरपंच महेंद्र कुडाळकर, ग्रा. पं. सदस्य संदेश उर्फ मन्या सावंत, मुंबई मंडळाचे कार्याध्यक्ष मंगेश सावंत मुख्याध्यापिका अनुराधा मेस्त्री, ग्रामविकास अधिकारी अमृता शेट्ये स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. 

यावेळी लोखंडी साकव दुरुस्ती कामकाज  लवकरच पूर्ण करून घेण्यास येईल. तोपर्यंत लोखंडी साकव रहदारीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. पर्यायी मार्ग म्हणून साकवापासून काही अंतरावर असलेल्या काँक्रीटच्या ब्रिज वरून ये जा करावी अशा सूचना विद्यार्थी आणि पालक वर्गाला देण्यात आली. 

या ओहोळावर पुलाचे काम प्रस्तावित आहे. तो देखील जिल्हा परिषदेकडून प्रस्ताव लवकरच मंजूर करून घेण्यात येईल. त्याला तांत्रिक मान्यता मिळाली आहे. प्रशासकीय मान्यता मिळून काम सुरू केले जाईल.असे  गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून हे काम तातडीने मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य संदेश सावंत यांनी दिली.