वैभववाडी: तरळे- गगनबावडा महामार्गाच्या झालेल्या दुरावस्थेबाबत लक्ष वेधण्यासाठी ठाकरे शिवसेनेच्या वतीने उद्या (दि-३०) पदयात्रा काढली जाणार आहे. केंद्र व राज्य सरकार यांच्या विरोधात ठाकरे गटाने एल्गार पुकारला आहे. तालुक्यातील व्यापारी शेतकरी व वाहन चालक यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन वैभववाडी तालुका शिवसेनेच्यावतीने करण्यात आले आहे.
कोकण व पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग तरळे गगनबावडा पुर्णतः खड्डेमय झाला आहे. या मार्गावरील करूघाटासहित वैभववाडी- तरळे मार्गाची अत्यंत दुरावस्था झाली आहे. या मार्गाच्या नूतनीकरणाचे काम मंजूर झाले आहे. मात्र कामाचा शुभारंभ करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे या खड्डेमय महामार्गातून प्रवास करताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत.तसेच अपघातही घडत आहेत. या खड्डेमय महामार्गाचा फटका तालुक्यातील व्यापारी, शेतकरी व वाहन चालक सहन करावा लागत आहे राज्य व केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्यामुळेच या महामार्गाच्या नूतनीकरणाचे काम रखडले आहे. त्यांना जाग आणण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने हे लक्षाणिक आंदोलन केले जात आहे.करून चेकपोस्ट ते नाधवडे पर्यंत ही पदयात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेत रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभेचे खासदार विनायक राऊत , आमदार वैभव नाईक, शिवसेनेचे नेते अरुण दुधवडकर, जिल्हा प्रमुख संदेश पारकर, जि.बॅक.माजी अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते अतुल रावराणे, महीला आघाडी प्रमुख निलम पालव, उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे , माजी बँक संचालक दिगंबर पाटील ,जि.कार्कारणी सदस्य संदीप सरवणकर यासह जिल्ह्यातील ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. तालुक्यातील शिवसेना, युवासेना व महीला आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके व युवा सेना तालुकाप्रमुख रोहित पावसकर यांनी केले आहे.