कुडाळ : १९७१ च्या भारत - पाक युद्धामध्ये महापराक्रम गाजवलेल्या ( T - 55) या रणगाड्याचे कुडाळ येथील सीबीएसई बोर्डाच्या बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल मध्ये दिनांक २० जाने. २०२४ रोजी आगमन होणार आहे. बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेने विद्यार्थ्यांना भारतीय सेनेने गाजवलेल्या महापराक्रमाची माहिती व्हावी, त्यांना भारतीय सैन्याच्या शस्त्र सामुग्रीचे ज्ञान मिळावे म्हणून भारतीय थल सेनेकडे रणगाडयाची ( Tank T-55 ) मागणी केली होती.
सदर भारतीय थलसेनेकडून (आर्मी) बॅ नाथ पै शिक्षण संस्थेचा प्रस्ताव मंजूर झाला असून हा रणगाडा १९७१ च्या भारत-पाक युध्दात महापराक्रम गाजवलेल्या रणगाडयापैकी एक रणगाडा आहे. हा रणगाडा ताब्यात घेण्याची सर्व प्रक्रीया पूर्ण केली असून १९ जानेवारी रोजी आर्मी विभागाच्या खडकी- पूणे येथून तो ताब्यात घेण्यात आला आहे. हा रणगाडा पुणे येथून निघून दिनांक २० जानेवारी रोजी सकाळी ७:०० वाजता फोंडा (कणकवली) येथे पोहचेल. फोंडा,कणकवली,कसाल,ओरोस,हुमरमळा,कुडाळ येथे पोहोचेल.डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ एन.सी.सी च्या विद्यार्थ्यांकडून रणगाड्याचे स्वागत करण्यात येईल. त्यानंतर बाजारपेठ मार्गे कुडाळ एमआयडीसी मधील बॅ.नाथ पै सेंन्ट्रल स्कूल (सी.बी.एस.ई) येथे उतरविण्यात येईल.अशी माहिती बॅ नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी दिली आहे.