वैभववाडी : गर्दीचा फायदा घेऊन कुंभवडे येथील वैशाली विजय चव्हाण, वय-५८ या महिलेचे १ लाख ८० हजार रूपये किमंतीचे दागिने आणि ३ हजारांची रोखड असा मुद्देमाल अज्ञाताने बॅगेतुन चोरला. हा प्रकार आज (ता.२४)सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी-दिवा गाडीत चढताना झाला.अज्ञाताविरोधात वैभववाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुंभवडे येथील वैशाली चव्हाण ही महिला आपल्या गावी गणेशोत्सवाकरीता आली होती. काल गौरीगणपती विसर्जन झाल्यानंतर आज सकाळी त्या सावंतवाडी-दिवा गाडीने मुंबईला जाण्यासाठी दहा वाजण्याच्या सुमारास वैभववाडी रेल्वेस्थानकात आल्या. त्यांच्यासोबत नातेवाईक महिला देखील होत्या.अकरा वाजण्याच्या सुमारास दिवा-सावंतवाडी ही गाडी वैभववाडी रेल्वेस्थानकात आली. यावेळी त्या सर्व महिला गाडी चढल्या. गाडीत चढल्यानंतर राजापुर रेल्वेस्थानकादरम्यान वैशाली यांना आपल्या बॅगेची चैन उघडी दिसली. त्यामुळे त्यांनी बॅगेत असलेले दागिने आहेत का म्हणुन पाहीले असता त्यांना बॅगेत दागिने दिसले नाहीत. आपल्या बॅगेतील दागिने चोरीस गेल्याचे लक्षात आल्यानतंर त्या पुन्हा वैभववाडीत आल्या.त्यांनी वैभववाडी पोलीस स्थानकात चोरीची तक्रार दिली. दोन तोळ्यांचे मंगळसुत्र, एक तोळ्यांची तासुमाळ आणि तीन हजार रूपये रोखड असा सुमारे दोन लाखांचा ऐवज अज्ञाताने चोरला आहे.
या तक्रारीनंतर पोलीसांनी तपासाला सुरूवात केली आहे.वैभववाडी रेल्वेस्थानक परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासुन पाहीले जात आहेत.यामध्ये कुणी संशयास्पद व्यक्ती दिसुन येते का हे पाहीले जात आहे.पोलीसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.