अशी आहे चिंदरची गावपळण

Edited by: प्रतिनिधी
Published on: November 19, 2022 14:38 PM
views 220  views

मालवण : तीन दिवस तीन रात्री वेशीबाहेर राहणाऱ्या चिंदर ग्रामस्थांच्या गावपळणीला सुरुवात झाली. गुराढोरांसह संपूर्ण गाव वेशीबाहेर गेल्याने गजबजलेल्या चिंदर गावात सन्नाटा पसरला आहे. गावाच्या वेशीबाहेर शेतात  राहुट्या उभ्या करत त्याठिकाणी आपला संसार थाटला आहे. गेली कित्येक वर्षे सुरू असलेली ही प्रथा चिंदर वासीयांनी अद्यापही सुरू ठेवली आहे.  


दर तीन वर्षांनी होणाऱ्या गावपळणीसाठी पळणीचे वर्ष आल्यावर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी बारा पाच मानकरी रवळनाथ मंदिरात जमून रवळनाथाला तांदळाचा एकदाच आणि एकच कौल प्रसाद घेतला जातो. त्रिसाली मर्यादा आली असून या वेळी गावपळण आणि देवपळण करण्यास तुझी परवानगी आसा काय, असं सांगणं करून उजवा कौल प्रसाद झाल्यावर बारा पाच मानकरी एकत्र (मेळ्यावर) बसून भटजींना विचारुन तारीख ठरवितात. गावपळणी दिवशी चिंदरवासीयांनी शुक्रवार सकाळपासूनच गाव सोडण्याची सुरुवात केल्याचे दिसून येत होते. शुक्रवारी अडीचच्या सुमारास  बारा पाच मानकरी रवळनाथ मंदिरात जमल्यावर रवळनाथाला सांगणे करून शिवकळा वाढवली गेली. सुरक्षेचे शिवकळेचे आर्शिवचन घेतल्यानंतर ढोलाचा इशारा झाला आणि चिंदरवासीय वेशीबाहेर पळू लागले.

कुणी खासगी वाहनांसह एसटी, रिक्षा, टेम्पोचा आधार घेत तर कोणी बैलगाडीतून जात होते. गुरंढोरांसह कुणी धावतपळत जात होते. ज्या भागातील लोकांना जी वेस जवळची होती, त्या भागात गेल्या आठ दिवसांपासून झटून रानावनात उभ्या करण्यात आलेल्या झोपड्यात आता नवा संसार थाटला आहे. काहींनी पाहुण्यांचा आधार घेतला आहे. या गावात ख्रिश्‍चन धर्मीयही मोठ्या आनंदाने वेशीबाहेर हिंदू धर्मीयांच्या सोबत आनंदाने राहत असल्याचे दिसून येते होते. आता तीन दिवस तीन रात्री देवाच्या भरोश्‍यावरच रानावनात आभाळाच्या छताखाली एकमेकांच्या सहवासात सहजीवनाचा आनंद घेतला जाणार आहे.

या तीन दिवसांत त्रिंबक येथील पावणाई मंदिरात दुपारी दोन वाजता बारा पाच मानकऱ्यांचा मेळा जमतो आणि आढावा घेतला जातो. चौथ्या दिवशी न बोलता शांतपणे बारा पाच मानकरी रवळनाथ मंदिरात एकत्र येत गाव भरण्याचा देवाचा हुकूम घेतात. तो सुद्धा एकदाच घेतला जातो. तो डावा झाल्यास पुन्हा पाचव्या दिवशी कौल प्रसाद घेतला जातो.

 

तीन दिवस तीन रात्री भजन फुगड्या, भेंड्या लावत मजेत आनंदाने घालवत असल्याचे सांगितले. एकूणच गेली शेकडो वर्षाची ही गावपळण परंपरा आजच्या विज्ञान युगातही निमित्त मात्र देवाच्या कौलाचे होऊन मोठ्या उत्साहाने पूर्ण गाव खाली करत रानावनात झोपड्यांमध्ये आनंदाने व्यथित करतात.