एसटीच्या वेळेत बदल करुन सोनुर्लीतील विद्यार्थ्यांची पायपीट थांबवा

उपसरपंच भरत गावकर यांची एसटी प्रशासनाकडे मागणी
Edited by: विनायक गावस
Published on: August 02, 2023 13:15 PM
views 235  views

सावंतवाडी : सोनुर्ली गावात सोडण्यात येणाऱ्या सव्वा अकराच्या बसच्या वेळेत बदल करुन कॅालेज विद्यार्थ्यांची होणारी पायपीट थांबवा,अन्यथा विद्यार्थ्यांना घेऊनच स्थानकात ठिय्या आंदोलन छेडू असा इशारा सोनुर्ली उपसरपंच भरत गावकर यांनी सावंतवाडी बस स्थानकाचे आगार व्यवस्थापक श्री शेवाळे यांना दिला. याबाबतचे निवेदनही त्यांनी सादर केले.

सोनुर्ली गावासाठी येथील बस स्थानकामधून सुटणारी सव्वा बाराची बस कोरोना काळापासून बंद करण्यात आली या बसचा फायदा सावंतवाडीमध्ये कॅालेजसाठी येणाऱ्या विद्यार्थ्याना होत होता विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता ही बस फेरी त्यामुळे सुरु करण्यात आली होती परंतु गेले दोन वर्ष होऊन जास्तकाळ ही बस बंद असल्याने शालेय विद्यार्थ्याना याचा फटका बसला आहे गावामध्ये सकाळी बसस्थानकातून सुटणारी सव्वा बाराची बसनंतर दुपारी सव्वादोन वाजता दुसरी बस आहे.

मात्र, या मधल्या वेळेत एकही बस नसल्याने कॅालेज विद्यार्थ्यांना शिरोडा किंवा रेडी बसचा आधार घेऊन न्हावेलीपर्यत प्रवास करावा लागतो. तेथून तब्बल पाच किलोमीटर दररोज पायपीट या विद्यार्थ्यांना करावी लागते गेले दीडवर्ष यासंदर्भात एसटी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु आहे लेखी निवेदन विद्यार्थ्यांना सह्यांची मोहिम घेऊनसुद्धा एसटी प्रशासनाला विद्यार्थ्याच्या समस्येची जाणीव होत नाही त्यामुळे निद्यार्थ्यांबरोबरच पालकवर्ग आणि ग्रामस्थांमधूनही नाराजी व्यक्त होत आहे.

सावंतवाडीत येणाऱ्या सोनुर्ली गावातील विद्यार्थ्याना सव्वा अकरा वाजता सोडण्यात येणारी बसफेरी चुकत असल्याने त्यांना तब्बल दोन ते तीन तास स्थानकामध्ये बसून राहण्याची पाळी येते त्यामुळे सव्वाअकरा वाजता सोडण्यात येणाऱ्या बसचा वेळ बारा केल्यास त्याचा फायदा कॅालेज विद्यार्थ्याना होणार आहे कारण साडेअकरा वाजता कॅालेज सुटत असल्याने या बसचा फायदा विद्यार्थ्याना होणार आहे. याचं संदर्भात आज सोनुर्ली उपसरपंच भरत गावकर यांनी आगार व्यवस्थापक श्री शेवाळे यांची भेट घेत त्यांना वस्तूस्तिथी पटवून दिली शिवाय येत्या आठ दिवसात यासंदर्भात निर्णय न्याय झाल्यास आपण विद्यार्थ्यांना घेऊन स्थानकातच ठिय्या आंदोलन छेडू असा इशारा दिला. दरम्यान येत्या आठ दिवसात हा प्रश्न मार्गी लावू असा शब्द श्री शेवाळे यांनी गावकर यांना दिला.