'शक्तिपीठ' मंत्र्याचे खिसे भरण्यासाठी का ? : विनायक राऊत

राणेंना आव्हान, केसरकरांना टोला ; अर्चना घारेंना 'ऑफर'
Edited by:
Published on: May 19, 2025 15:24 PM
views 93  views

सावंतवाडी : शक्तिपीठ महामार्गामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे‌. आम्हाला मुंबई - गोवा व कोस्टल रोड महत्वाचा आहे, शक्तिपीठ नाही. रत्नागिरी ते नागपूर हा मोठा रस्ता सुरु आहे. त्यामुळे शक्तीपीठ उभा करण्याचा उद्देश काय ? यासाठी लागणारा निधी शेतकरी, जनतेच्या हिताचा आहे की ठेकेदारांच्या आडून मंत्र्यांचे खिसे भरणारा ? असा सवाल माजी खासदार विनायक राऊत यांनी केला. तसेच राणेंनी पोकळ धमक्या देऊ नये. बाधीत शेतकरी, बागायतदारांसह आम्ही खंबीरपणे उभे आहोत. हिंमत असेल तर आमच्या तंगड्या तोडायला यावं असं आव्हान विनायक राऊत यांनी दिले. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राऊत म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून जाणार आहे. ८०० किलोमीटर पेक्षा अधिक व ८६ हजार कोटी रुपये खर्च करून तयार होणार आहे. याला शेतकऱ्यांचा मोठा विरोध आहे. वर्धा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावांतील बागा, शेतजमीनी बाधीत होणार आहे. जैवविविधता नष्ट होणार होऊन जंगल उद्ध्वस्त होणार आहे. ३०० फूट रूंदीचा हा शक्तिपीठ उभारताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे‌. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत फटका बसू नये म्हणून शक्तीपीठ होऊ देणार नाही अशी आश्वासनं सरकारमधील मंत्र्यांनी दिली होती. तेव्हाचे सिंधुदुर्गचे पालकमंत्री गप्पच बसले होते. या महामार्गाच्या मोजणीला सुरूवात झाली आहे. सिंधुदुर्गतील १२ गावांनी याला विरोध केला आहे. तशी निवेदन शासनाला दिली आहेत. मात्र, सत्तेचा दुरूपयोग करून जबरदस्तीने जमीनी संपादित करण्याचा महाराष्ट्र सरकारचा डाव आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उभी आहे असे प्रतिपादन केले.

दरम्यान, विकासाला आमचा विरोध नाही. मात्र, रविंद्र चव्हाण यांच्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई गोवा महामार्गाची नवी हेडलाईन दिली आहे. अजून बरंच काम शिल्लक असल्याने एक वर्ष तरी जाणार आहे. त्यामुळे ३० जूनच आश्वासन फसव ठरणार आहे. मुंबई गोवा महामार्ग पुरा करायचा नाही. कोस्टल रोड हा खरा भाग्यविधाता आहे. याबाबत सरकार गप्प आहे.  शक्तिपीठला होणारा खर्च हा जागतिक विक्रम मोडणारा आहे‌. तो निधी शेतकरी, जनतेच्या हिताचा आहे की ठेकेदारांच्या आडून मंत्र्यांचे खिसे भरणारा आहे ? याच उत्तर द्याव अस आवाहन केल. तसेच नारायण राणे यांनी पोकळ धमक्या देऊ नये. फटके देण्याची भाषा ते करत आहेत अजूनही त्यांचा मूळ स्वभाव बदलेला नाही. मात्र, जे शेतकरी, बागायतदार आपल्या जमीनी वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे त्यांच्यासह आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत. १२ गावातील ग्रामस्थांची प्रत्यक्ष भेट घेणार आहोत. त्यामुळे हिंमत असेल तर आमच्या तंगड्या तोडायला यावं असं आव्हान माजी खासदार राऊत यांनी दिले. आम्ही शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी उभे राहणार आहोत. तुम्ही ठेकेदाराच्या हितासाठी आम्हाला फटके देणार असाल तर आम्हीही मेलेल्या आईचं दूध प्यायलेले नाही. शक्तिपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांना नामशेष करणारा मार्ग आहे. त्याला आमचा ठाम विरोध राहील. विरोधाला विरोध आम्ही केला नाही. प्रकल्पाच्या नावाखाली आजूबाजीच्या गोरगरीबांच्या जमीनी हडपण्याचा डाव आखला होता त्याला आम्ही विरोध केला. अशा प्रवृत्तींना आम्ही विरोध केल्याचे स्पष्ट केले. 


केसरकरांनी मल्टिस्पेशालिटी कुजवल

तसेच मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल न होण हे सावंतवाडीकरांच दुर्दैव आहे. निधीची तरतूद असताना दीपक केसरकर यांच्या हट्टापोटी ते झालं नाही. हा विषय कुजवण्याच काम त्यांनी केल. वेत्ये येथे जमीन उपलब्ध करून देत असताना देखील ते होऊ दिलं नाही. केसरकर यांच्या हट्टापोटी ते रखडलं. यामुळेच येथील जनतेला मरणयातना सहन कराव्या लागत आहे. ते संधीसाधू असून एकनाथ शिंदेंशी काडीमोड घेऊन देवेंद्र फडणवीसांच्या गोटात जाऊन बसतील असा टोलाही हाणला. 

अर्चना घारेंना पक्षप्रवेशाची ऑफर

आमच्या शिवसेनेतील कार्यकर्ते मजबूत आहेत. ते विकले जाणारे नाहीत. प्रामाणिक कार्यकर्त्यांची कमी आमच्याकडे नाहीत. विकाऊ लोक आमच्याकडे नाहीत. निवडणूकीच्यावेळी काही गोष्टी नाईलाजास्तव कराव्या लागतात. मात्र, कार्यकर्त्यांना दुर्लक्षित करू शकत नाही. त्यावेळी झालेल्या चुकांच चिंतन आम्ही केलं आहे. विधानसभा निवडणुकीत आम्ही कमी पडलो. तर अर्चना घारे यांनी आमच्याकडे यावं यासाठी त्यावेळी देखील विनंती केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस श.प. पार्टीच्या त्या प्रामाणिक कार्यकर्त्या आहेत. आमचे सगळे पदाधिकारी त्यांचे काम करण्यास इच्छुक होते. त्या शिवसेनेत आल्या असत्या तर निश्चितच संधी दिली असती. भविष्यात येणार असतील तर त्यांच स्वागत करू अशी ऑफर दिली. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, महिला प्रमुख श्रेया परब, विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, रमेश गांवकर, मायकल डिसोझा, बाळू परब, गुणाजी गावडे, शैलैश गौंडळकर, निशांत तोरसकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.